Saturday, June 06, 2026
स्मित आणि हास्य !
स्मित आणि हास्य !
आज गॅलरीत बसलो असताना सहज विचार आला की परमेश्वराने ही सर्व सृष्टी निर्माण करताना त्यांत किती किती विविधता भरून ठेवली आहे नै ! कोणतेही दोन चेहेरे कधीही सेम टु सेम नसतात आणि प्रत्येक चेहेऱ्यावरचा भाव किती वेगळा होत असतो क्षणोक्षणी. तथापि काही चेहेरे कायम त्रासलेले, काही दुर्मुखलेले, काही शांत प्रसन्न तर काही उच्छृंकल, हावरट वाटावे असे. काहींवर मंद स्मित कोरलेले तर काही कित्येक अर्थ काढता येतील असे मोनालिसा सारखे ! काही कायम रागीट भासणारे तर काही मातेप्रमाणे स्निग्ध नि सोज्वळ.
मला मोटार गाड्यांचा विलक्षण छंद होता बालवयापासूनच हे अनेकवेळा सांगून झाले आहे. त्याचे मूळ कारण आत्तांच लक्षात आले आणि ते म्हणजे प्रत्येक मोटारीचा मुखवटा ! काही गाड्यांची चेहेरेपट्टी मला जास्त आवडायची, त्यातल्या त्यांत हसऱ्या-बुजऱ्या दिसणाऱ्या, जशा मॉरिस मायनर, ऑस्टिन, प्रिफेक्ट फोर्ड, व्हीएट फोर्ड, शेव्हरलेट नि वूल्सले. मात्र डॉज, प्लायमाऊथ, स्टुडबेकर आणि मर्सिडीज काहीशा रांगड्या नि रागीट भासत ! तुम्हाला सांगतो, त्या मोटारींच्या फ्रंट व्ह्यू वरून मी सहज तिचा मेक किंवा ब्रॅंड ओळखायचो. काहींची बॉनेट्स आणि फ्रंटेज विलक्षण गोंडस वाटायचे मला. हीच गोष्ट पाळीव प्राण्यांची. एखाद्या कुत्र्याचं किंवा मांजराची चेहेरेपट्टी खूप गोड वाटायची तर काहींची भ्यासुर ! मात्र एक बाब बालपणीच लक्षात आली तुम्हाला सांगतो की माणसासारखीच जनावरांची पिल्लें देखील लहानपणी खूप गोंडस दिसतात, अगदी कोंबडी किंवा गर्दभाची पण.
तरीही, ज्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य झळकत असते त्यावर कुणाचाही जीव जडत असतो. एकेकाळी रघुवीर मुळगावकरांची चित्रें खूप मन-लुभावनी वाटत, मग तीं राम-कृष्णांची असोत की मारूतीरायांची. मला वाटतं त्यांनी रावण, शूर्पणखा, घटोत्कच किंवा हिडिंबेची चित्रे म्हणूनच काढली नसावीत कारण तिथे स्मितहास्य कसे दाखवणार, तिथे केवळ बीभत्स हास्याचा गडगडाट !
तुम्हाला म्हणून सांगतो, ‘एकेकाळी’ काही नटनट्या खूप आवडत मला. मला स्पष्ट आठवतेय एक नटी कामिनी कदम नावाची जी सिनेसृष्टीत स्मिता म्हणून काही काळ वावरली. तेव्हा रेखाचित्रा, जयश्री गडकर, उषा किरण, उषा चव्हाण, पद्मा चव्हाण वगैरे सौंदऱ्यवती असल्या तरी सुलोचना रत्नमाला वगैरे बऱ्यापैकी सोज्वळ चेहेऱ्यांच्या नट्या अस्तित्वात होत्या, तरी कामिनी कदमचे शॉर्ट पदार्पण लोभस वाटले होते खास ! इंदिरा चिटणीस खाष्ट असूनही आवडायच्या. पुरूष नटांबद्दलही किंचित बोलणे वावगे वाटू नये म्हणून केवळ ! रमेश देव, चित्तरंजन कोल्हटकर, विवेक अभ्यंकर वगैरे देखणे असले तरी दामुअण्णा, धुमाळ, सूर्यकांत-चंद्रकांत वगैरे मातब्बर आणि मधु आपटे हा तोतरा नट भाव खाऊन जायचा. असो.
अखेर प्रत्येक व्यक्तीची चेहेरेपट्टी त्याच्या अंतरंगाचे प्रतिबिंब असते असे म्हटले तरी कित्येकजण जाणीवपूर्वक ते लपवून खोटे हंसू दाखवीत असतात, टीव्हीवरच्या बाबा-बुवांसारखे. अर्थात ते नाटकही फार काळ टिकत नसते हेच खरे !
अखंडित प्रसन्नता अंगीं बाणवण्यासाठी खूप मशक्कत करावी लागते बरं का ! मुळात तसा पिंड असावा लागतो. प्रसन्नता कुणी कुणाला देऊ शकत नाही खिरापतीसारखी, ती स्वत:च मिळवावी लागते. तुम्हाला पुन्हा सांगतो, ते प्रयत्नसाध्य आहे.
आत्तां अचानक माऊलींची ओंवी आठवली- ‘देखें अखंडित प्रसन्नता / आथी (आहे) जेथ चित्ता / रिगणे नाही (उद्भवत नाही) समस्तां / संसारदु:खां //‘ म्हटलेच आहे ‘प्रसादस्तु प्रसन्नता’ - प्रसन्नता किंवा ‘स्मित-हास्य’ हाच प्रसाद होय !
खूप खूप विषयांतर होत गेलंय ना, साहाजिकच आहे, वयं मोठं खोटम् ! !
रहाळकर
६ जून २०२६.
Thursday, June 04, 2026
समर्थांचा दासबोध-एक विहंगावलोकन !
समर्थांचा दासबोध - एक विहंगावलोकन !
विहंगावलोकन म्हणजे ‘बर्ड्स् आयव्ह्यू’ बरं का ! मला ठाऊक आहे की तुमच्यातील प्रत्येकाने या महान ग्रंथाचे नाव ऐकले असेल, तो हातीं घेतला असेल, कित्येकांनी तो एकदाच नव्हे तर अनेकदां वाचला असेल, कित्येकांनी त्याची पारायणे केली असतील तर काहींनी त्याचे अंतरंग पिंजून काढले असेल. तर मग मला आज आकाशांत भरारी घेऊन त्याला तेथून पहावेसे का वाटले असावे असा प्रश्न कदाचित तुम्हाला पडला नसला तरी मला तो पडलाय् ! असं पहा की आपण कित्येक वेळां काही ग्रंथांच्या प्रेमात पडतो, ते वाचून काढतो- कधी पुन:पुन्हा- आणि नंतर ते नजरेआड करतो. मग एखाद्या भल्या पहांटे त्याची पुन्हा याद येते आणि आपण फडताळ उघडतो. त्याचवेळी लक्षात येतं की कुणीतरी तो आधीच मागून नेलाय् वाचण्यासाठी ! ती चुटपुट काही स्वस्थ बसू देत नाही नि म्हणून आपणच कधीतरी काढलेली त्या ग्रंथाची टिपणें शोधून काढतो. फार गमतीदार असतो बरं का तो अनुभव, कारण आपण तेव्हा टिपून घेतलेले कित्येक उतारे आज अचानक अधिक रेलेव्हंट किंवा प्रासंगिक वाटूं लागतात.
आज अगदी तस्सेच घडले. पुस्तक तर मिळालेच नि त्यावरील टिपणें देखील. तरीही वाटलं की काहीतरी ‘मिसिंग’ आहे त्यांत, म्हणून तेच पुन्हा ‘कनेक्ट’ करावे म्हणून हा खटाटोप !
तर ‘विहंगावलोकन’ श्रीदासबोधाचे -
खरंतर अखिल भारतात रामायण महाभारत भागवत आणि गीतेचे वाचन, अध्ययन, अध्यापन आणि परिशीलन शतकानुशतकें चालू आहे. वेद उपनिषदें आणि गीता या संस्कृत ग्रंथांनी निखळ आध्यात्माची जोपासना केली आहे. मात्र महाराष्ट्रांत ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, एकनाथांचे भागवत, समर्थ रामदासांचा दासबोध या ग्रंथांनी शुद्ध अध्यात्म जीवंत ठेवले आहे. ही सर्वच मंडळी भक्तोत्तम् होती, साक्षात्कारी होती आणि नि:संशय ब्रह्मज्ञानी देखील. त्यांचे जीवन आध्यात्मिक अनुभवांनी अतिशय समृद्ध, श्रीमंत होते आणि म्हणूनच त्यांनी आपापल्या ग्रंथांतून ते सर्व भांडार आपल्यासारख्यांना मुक्तहस्तें वाटून टाकले.
आपल्यातील प्रत्येकजण ‘मी’ म्हणजे हा नश्वर देह या भ्रामक समजुतींत जगत असतो. आपल्याला हे दृष्य जग सारखेपणाने अनुभवास येते. आत्मज्ञानी किंवा ब्रह्मज्ञानी पुरूष अयम् आत्मा- ‘मी ब्रह्म आहे’ या निश्चित मताने आपले जीवन व्यतीत करतात ; त्यांना एकच एक परमात्मवस्तु सारखेपणाने विश्वांत भरली असल्याची प्रचीती येते. ते स्वत: संत असल्याने सर्वच संतांचे परब्रह्मस्वरूपाचे अनुभव मूलत: समान असतात, अगदी सारखे असतात. तथापि परमात्म-स्वरूपाच्या प्रत्यक्ष दर्शनाने संपूर्ण समाधान पावलेले हे संत आत्मसाक्षात्कारा नंतरही स्वस्थ बसत नाहीत. आपल्या सभोवार पसरलेल्या लहानमोठ्या सर्व मानव समूहांनी सुखमय जीवन जगावे, परब्रह्मवस्तूचे प्रत्यक्ष दर्शन आणि अनुभव घ्यावा आणि आपल्यासारखेच कृतार्थ व्हावे म्हणून ते आयुष्यभर झटत राहतात. लोक-कल्याणाच्या, लोक-संग्रहाच्या या पवित्र कार्यासाठी ही संतमंडळी आपले शरीर, वाणी नि लेखणी अक्षरश: अहोरात्र झिजवतात.
हे संगळे दैवी गुण श्रीसमर्थांच्या जीवनात उत्कटपणे दृग्गोचर होतात. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आणि मग त्यांनी आघ्यात्मिक नेतेपणाची धुरा समर्थपणे सांभाळली. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने श्रमप्रधान लोकसंग्रह आरंभिला. लोकांमध्यें समूहभावना, सामाजिक कर्तव्यें निर्माण करण्यासाठी कितीतरी मठ स्थापन केले आणि प्रत्येक मठात लोकशिक्षणाचे काम नि:स्वार्थपणे करणारे संन्यासी महंत तयार केले. त्या सगळ्या महंतांचे महंत म्हणून समर्थांचा अफाट व्याप होता. अक्षरश: हजारो स्त्रीपुरूष त्यांना भेटून गेले असणार. त्यांपैकी कित्येकांशी ते कितीतरी अध्यात्म बोलले असणार. अनेकांना त्यांनी साधनेमध्ये, राजकारणात, व्यवहारात आणि व्यक्तिगत समस्यांमधे यथार्थ मार्गदर्शन केले असणार. त्यांची ती संभाषणें निरूपणे विनोदवचनें आणि समस्या-समाधान काळाच्या उदरांत गडप झालीत. तथापि आपल्या सुदैवाने श्रीसमर्थांनी विपुल साहित्य-वांग्मय लिहूनही त्या सर्व खजिन्यात श्रीमत् दासबोध एखाद्या कोहिनूर हिऱ्याप्रमाणे शोभून दिसतो. आध्यात्मदृष्ट्या जगाला कल्याणकारक असे जे जीवन-तत्वज्ञान त्यांचेपाशी होते ते दासबोधामध्ये एकत्र गुंफलेले दिसून येईल. त्या ग्रंथराजाचा अतिशय विनम्रपणे आढावा घेऊंया ( मनातल्या अवकाशातून ! ! )
क्रमश:………
रहाळकर
४ जून २०२६