Tuesday, December 23, 2025
सेल्फ ऑडिट - एक स्व-मूल्यांकन !
सेल्फ-ऑडिट एक स्व-मूल्यांकन !
अनेक वर्षांपूर्वी आमच्या स्टडी सर्कल मध्ये सहभाग घेत असताना माणसांतील सद्गुण-दुर्गुणांवरील चर्चा खूप रंगली होती. त्यावेळी मला चिटोऱ्यांवर टिपणे लिहून ठेवायची वाइट्ट खोड लागली होती. पूर्ण शीट्सचा वापर क्वचित होई आणि ती चिटोरी देखील ड्रावर मधे इतस्तथा पसरलेली असत. कधीकाळी मूड आलाच तर ती फुलस्केपवर उतरून काढत असे मी.
आज अचानक त्यातला एक कागद हातीं आला आणि वाटलं तुम्हालाही तो साझा करावा !
त्या दिवशी आम्ही सद्गुण-दुर्गुणांची यादी तयार केली होती आणि त्यांची व्याप्ती पाहूनच गलितगात्र झाले होतो आम्ही सर्व. एक नुसती झलक दाखवणार आहे आत्तां, पण एऱ्हवीं ती प्रचंड आहे परमेश्वराच्या असंख्य विभूतींसारखी. असो.
खरंतर प्रत्येकालाच असं नेहमी वाटत असतं की आपली मुलेबाळें सद्गुणी असावीत, त्यांच्यात कोणत्याही वाईट संवई रूजूं नयेत. आपण स्वत:ही कधी सन्मार्ग सोडू नये. मग त्यासाठी काय करायला हवे ? सद्गुण-दुर्गुणांची निदान ओळख तर हवीच ना ? थांबा, कोणतेही अवजड प्रवचन न करता केवळ एक यादी तुमचेसमोर ठेवणार आहे. कारण शुद्ध सद्गुणी नि निव्वळ दुर्गुणी कोणीच नसतो. सबब त्यांत योग्य काय अयोग्य काय याचा निवाडा ज्याने त्याने आपापला करायचा आहे. ( आजही प्रस्तावना पुन्हा लांबलीच ! ) असो.
मात्र त्याही आधी एक बाब अधोरेखित करणे अगत्याचे आहे की आपल्यातील अवगुण हेच गुण मानणे हा दुर्गुणाचा कळस होय ! सो, बिवेअर ! !
वास्तविक दुसऱ्यांतील सद्गुण पाहायचे नि आपले दुर्गुण निपटून टाकण्यासाठी केलेले प्रयास सद्गुण-पोषणासाठी उपयुक्त ठरतील. दुर्गुण, पाप-पुण्याची वासना, पशुत्व, विकार मलिनता, देहबुद्धी वगैरे सगळे शब्द समानार्थी आहेत.
षड्रिपूंबद्दल तर आपण बालवयापासून ऐकत आले आहोत. त्यातील काम, क्रोध, मद , मत्सर, दंभ नि ईर्षा यां बरोबरच आळस, अति-निद्रा, संशय, भय, चिंता, आपलेच ते खरे असे वाटणे, स्वत:ला न येणारे न शिकणे, वादविवाद, शोक, संताप, परनिंदा, क्रियेवीण बोलणे, ( इतरांचा ) पैसा वैभव पाहून भुलणे नि मिंधे होणे, ‘मी’पण, वासनांवर नियंत्रण न ठेवता येणे, एकाग्र न होता येणे, सुखलालसा, व्यसनाघीनता, कठोर कर्कश खोटे उपहासाने बोलणे, छद्मीपण, दुसऱ्याचे दोष काढणे, अति-विनोद करणे, प्रसंगीं गंभीर न होणे, अभिमान नि गर्व, संसारातील दु:खांसाठी परमेश्वराला शिव्याशाप देणे,, सगुण-भजन न करणे, स्व-धर्माला गौण मानणे, साधनेची निंदा करणे, अति-करमणुकीत रमणे, वडिलांचा-थोरांचा अनादर, संतांची टिंगल टवाळी, इतरांना तुच्छ मानणे वगैरे वगैरे वगैरे !
तसे पाहिले तर ही यादी अजूनही अपुरी आहे. तथापि, अशा दुर्गुणांमुळे प्रापंचिक सुखाला, समाजातील सुसंवादाला आणि आध्यात्मिक विकासाला फार मोठी हानी पोहोचते एवढे समजले तरी पुरेसे आहे !
खरंतर, दुर्गुणांच्या या छोट्याशा यादीपेक्षां सद्गुणांची यादी खूप मोठी आहे, तिचा आपण प्रत्यहीं अंगिकार करीत असतो. त्यातील अगदी मोजक्याच उधृत करून थांबेन अशी खात्री देतो.
‘सत्य-धर्म-शांती-प्रेम-अहिंसा’ ही त्या चौऱ्यांशी मानवी मूल्यांचा परिपाक होय. अशा यादीचे दोन प्रकारांत विभाजन करता येईल.
एक- नकारात्मक सद्गुण, जसे नि:स्पृहता निरासक्ति निर्ममता निरहंकार निर्मत्सर निर्व्यसन निर्विकार निष्कपट नि:संदेह वगैरे. तर होकारात्मक सद्गुण म्हणजे सहना दुसऱ्याचे दोष गिळणे सतत शांती टिकवणे ईश्वरचिंतन अनुसंघान बाळगगणे आर्जव परोपकार सदा प्रसन्न राहणे संतोष आणि सर्वांना आत्मरूप मानणे !
ए टॉल ऑर्डर इंडीड ! कठीण पण असाध्य नाही !
जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.
रहाळकर
२३ डिसेंबर २०२५.
Monday, December 22, 2025
इकडचं तिकडचं !
इकडचं तिकडचं !
परवांच पुन्हा एकदा अनिलांच्या कविता वाचनांत आल्या. माझ्या आवडत्या कवितांपैकीं ‘तळ्याकाठीं’ या कवितेच्या काही ओळी विनाकारण मनात रूंजी घालत राहिल्या - “अशा एखाद्या तळ्याच्या काठीं बसून राहावे मला वाटते / जिथे शांतता स्वत:च निवारा शोधीत आली असते…..”
काय सुंदर कल्पना आहे नाही !
मात्र आता स्वच्छ शांत निवांत तळीं मिळणे अवघड, त्यातून आपल्या स्वत:ला अशा निवान्त क्षणांची गरज असली तरी खरंच काढता येतात का हो असे निवान्तपण ? आणि समजा जमलंच तर आपल्याकडच्या तळ्यांकाठी, त्यातून सांजवेळी काहीशी भीती नि कसलीशी हुरहुरच जास्त वाटते नाही ? भीती जवळपासच्या पालापाचोळ्यातील सळसळीची, आणि हुरहुर या वयात दुसरी कोणती तर भा.रा.तांब्यांच्या दुसऱ्या एका कवितेतल्या ‘मधु मागसि माझ्या सख्या परी’ मधल्या - ‘संध्याछाया भिववित हृदया…’ ! असो.
आज भर दुपारी एकटाच भटकंती करायला बाहेर पडलो. आता वाढत्या वयानुरूप मिळालेल्या मोफत ‘फ्रीडम-पास’ मुळे लंडनभर कुठेही केव्हाही भटकंती करायची मोकळीक असल्याने ‘कोव्हेन्ट गार्डन’ या पर्यटकांनी गजबजलेल्या मेळ्यांत येऊन पोहोचलो. आपल्याकडे जसे गारूड्यांचे खेळ चालतात तसे इथेही विविध मनोरंजनात्मक खेळ, नकला, कसरती आणि ‘ म्यूझिकचे’ भरपूर कार्यक्रम सतत चालू असतात. त्या तशा कोलाहलात जरासा शांतपणे थोडावेळ बसून पाहिले पण मन काही रमेना.
म्हणून तेथून सरळ नॉरवुडच्या भल्या मोठ्या जलाशयाजवळ जाऊन बसलो. तिथे त्यावेळी माणसांची अजिबात गजबज नव्हती. बहुधा एकटाच. त्या विस्तीर्ण जलाशयाला प्रदक्षिणा घालून एका बांकड्यावर स्थानापन्न झालो. पाण्यांत मुबलक फिरणारी बदकें, राजहंस, कित्येक पक्ष्यांचा किलकिलाट एवढेच सोबतीला. पाण्याची सतत चाललेली चुळबुळ पाहात खूप वेळ नुसताच बसून राहिलो आजवरच्या कित्येक आठवणींना गोंजारत. खराखुरा निवान्तपणा अनुभवत होतो खूप दिवसांनी. आणि अचानक अनिलांची मला आवडणारी कविता आठवली आणि नंतर अनेकानेक तत्सम कवितांनी गर्दी करायला सुरूवात केली आणि जाणवले की कितीही निवान्तपण शोधायचा उपद्व्याप करून पाहिला तरी या बेट्या आठवणी नि कविता काही पिच्छा सोडत नसतात !
आज खरोखर ‘इकडचं तिकडचं’ लिहिलं पहा, कुठलाही शेंडाबुडखा नसलेलं लिखाण !
रहाळकर
लंडन
७ सप्टेंबर २००७.