Tuesday, July 08, 2025

 

तीन कविता !

 एकूण तीन कविता


आम्ही साधारण तीन आठवड्यापूर्वीं इथे लंडनमध्ये पुन्हा एकदा डेरेदाखल जाहलों. चि. श्रीश आणि सौ. अलका मुद्दाम आम्हाला आणण्यासाठी पुण्यांत आले होते कारण यावेळी माझ्या मनाची फारशी इच्छा नव्हती आमच्याच म्हातारपणच्या तक्रारी पाहतां. मात्र त्या उभयतांनी धाडस दिले आणि अक्षरश: फुलासारखे हळुवारपणे इथे घेऊन आले. इथे पोहोचतांच दुसरेच दिवसापासून आमचे बस्तान व्यवस्थित बसले, पुण्यांत असलेली मरगळ हां हां म्हणता विरून गेली. पुन्हा नव्या जोमाने दिवसाला सामोरे जाऊं लागलो, दररोजचे फिरणे नियमित सुरू झाले आणि माझी लेखणी (आयपॅड) पुन्हा कार्यरत झाली, नि दररोज नवनवीन खाद्य मागूं लागली ! रोजरोज नवीन काय बोलणार या संभ्रमात असताना ड्रॉवरमधे या तीन कविता आढळल्या कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेल्या. सबब आजशिळ्या कढीला ऊतम्हणत ही प्लेट तुम्हा सुहृदांसाठी


आधी उषाने सहजगत्या लिहिलेल्या या पंक्ती….!

गुढी

गुढी उंच उभारूं

मांगल्याची

तोरण बांधूं

पावित्र्याचे

सज्ज होऊं सारे आपण

स्वागत करण्या नववर्षाचे

सोडून देऊं हेवेदावे

करूं उधळण प्रेमाची

स्वार्थाला नच देऊ थारा

कुणीच अपुल्या मनीं ! ! 

उषा रहाळकर

एप्रिल २००७

लंडन


आतां माझ्या आई विषयीं

आई

नमितों तुज शतशतदां आई

प्रेमस्वरूप तूं करणासिंधू

चारित्र्याची मूर्तिमंत खाण तूं


भावुक म्हणुनी जगत् सुखास्तव

तळमळली धडपडलीस तूं 

सांवरलेस तूं कितीजणांना

आवरलेस तूं

अन् कितिक जणांचा आधार तूच तूं


शांतिरूप अन् निगर्वताही

हरहुन्नरी जननी आई

मांगल्याची मूसच जणू तूं होसी

नमितों तुज शतशतदां , आई ! !

प्रभु रहाळकर

जुलाय २०१०


आतां शेवटली बरं का आजच्यासाठी

कवी

होय, मी पण आहे एक कवी

अगदीकवीम् कवीनाम्नसलों तरीही…….! 

(एव्हांना ओळखलेच असेल म्हणा तुम्ही ! )

कारण

मी भावविश्वांत रमतो,

मला आकळतात भाव-भावना

थव्यांतली माणसें नि माणसातले थवे

ओळखता येतात मला.

त्या थव्यांतील माणुसपणाशी 

नातें जुळते माझे, गट्टीही होते

म्हणून मी कवी !


कुणी मला एककल्ली निगरगट्ट म्हटलं तरी

संवेदनशील आहे बरं का माझं मन,

तरल, भिरभिरणारं, बागडणारं

पण तरीही काळजाचा ठाव घेणारं

एकदां बसलंच तर तिथून 

अज्जिबात हलणारं !


निसर्ग मला खुणावतो,

जवळ ये म्हणतो,

मीही हरखतो हरवतो गुंगून जातो

मनाच्या कॅनव्हासवर

त्याला शिगोशीग उतरून घेतो…….! 


पक्ष्यांच्या किलबिली बरोबरच

चर्चचा घंटानाद मला भुरळ घालतो

शांतीची प्रशांतीची अनुभूती देतो……! 

मी रमतो, सुखावतो

म्हणून मी कवी ! ! 


विंदा करंदीकर म्हणाले,

ज्याला कविता कळते तो कवी

कविता तर माझ्यात खोलवर दडी मारून बसते


खरंतर म्हणूनच मी कवी ! ! ! 

रहाळकर

/ / २००७

लंडन.      



Monday, July 07, 2025

 

मनोरथा चल त्या नगरीला…..!

 मनोरथा चल त्या नगरीला………! 


मनोरथा चल त्या नगरीला

भूलोकींच्या अमरावतीलाहे गदिमांनी रचलेलं, बाबूजींनी संगीतसाज चढवलेलं आणि लताजी, मालती पांडे इत्यादिकींनी मधुर स्वरात गायिलेलं गीत आज पुन्हा ऐकावं असं वाटलं, त्याचे शब्द सांठवून घ्यावेसे वाटले म्हणून गूगल् बाबाला विनंती केली आणि त्याने ती तात्काळ मान्यही केली


गीताचा संदर्भ अयोध्या नगरी आणि प्रभू रामचंद्रांचा असला तरी या प्रभूने तो धागा पकडून मनोमन असंख्य नगरींचा फेरफटका मारून घेतला ! खरं तर या प्रभूला प्रत्येक नगरीचे अप्रूप नि आकर्षण वाटत राहिले आहे. आता अजून या वयातही त्याला विविध नगरें मनसोक्त पाहावीशी वाटतात, प्रत्येकीतली खासियत तो शोधून काढतो, तिथली बोलीभाषा समजून घ्यायचा प्रयत्न करतो, जमलं तर संवाद साधतो आणि तिथल्या दुनियेंत अल्पकाळ का होईना गुंतून जातो, अर्थात पुढची नगरी पादाक्रान्त होईपर्यंत

हे खूळ त्याच्या डोक्यात कधीपासून भिनलंय् विचारतां ? मला वाटतं त्याच्या अगदी बालपणापासूनच. कारण आजही तो नावांसकट त्याने पाहिलेल्या विविध गांवगांव, बस्तीबस्ती, शहरशहर और नगरडगरचे सविस्तर वर्णन करू शकतो. त्याचे वडिलांची बदलीची ठिकाणे आणि दौऱ्यांच्या जागीं तर तो असंख्य वेळां गेला आहेच पण वयाच्या उत्तरार्धातही लेक-जांवई नि मुलगा सुनेबरोबर (होय नातींबरोबर देखील ! ) त्याने भरपूर भटकंती केलेली आहे. मात्र स्वत:च्या धडपडीच्या काळांत काही मोजक्याच ठिकाणी त्याचे भटकणे झाले हेही खरेच


त्याला सर्वप्रथम भावलं ते त्याचे आज्जोळ उजैन ! फ्रीगंज माधवनगर मधली टोलेजंग .के.बिल्डिंग त्याला खूप आवडायची. आज्जी-आजोबा, मामालोक नि मामे-मावस भावंडांत बऱ्यापैकी रमायचा तो, पण जास्त वेळ एकट्याने घालवायचा. स्थूल शरीरमानामुळे मैदानी खेळ फारसे जमले नसले तरी संघाचे बाळकडू त्याला उज्जैन नगरीं मिळाले हे तो कौतुकाने मान्य करेल


निमाड  प्रांतातील खरगोण जिल्ह्यात वसलेली इटुकली सेगांव ही नगरी तेव्हा मोठी वाटायची त्याला, प्रत्यक्षात जेमतेम हजार पाचशे उंबरढे असावेत - बहुतेक करून, त्याच्या अंदाजाने, त्याला वाटतं की ! असो


नंतर राजस्थान बॉर्डरवरील गरोठ हे नगर. तिथे त्याचीसोडमुंजझाली, तो शाळेत जाऊ लागला तिथल्या आणि ती नगरी त्याला खूप आवडली. भरपूर मोर, ससे, कोल्हे नि खूपश्या शेळ्यामेंढ्या, दुभती जनावरें म्हणजे गाईम्हशींच्या मागे भरपूर भटकायला आवडू लागले त्याला


आह, शिवपुरी ! एक  नितान्त सुंदर नगरी नि:शंकपणे. सिंधिया राज्यातले एक हिलस्टेशन लाल मातीने माखलेले सर्वदूर. उत्तम प्रकारे आंखीवरेखीव पद्धतीने वसविलेले हे नगर म्हणजे विलक्षण निसर्गरम्यता, एकाहून एक सरस सुंदर दगडी बंगले किंवाकोठी’, सुंदर आखलेले रस्ते चौक आणि दुतर्फा लावलेले विशाल वृक्ष नि विजेचे दिवे वगैरेंमुळे तत्कालीन महाराजांची दुसरी राजधानी असलेल्या या नगरीं सलग तीन वर्षें राहण्याचे भाग्य आमच्या प्रभूलाही लाभले. तोंवर तो बारा वर्षांचा झाला होता नि बाराव्या वर्षातले सर्व गुणधर्म उफाळून वर येत होते. नुकतीच मोठी सायकल चालवूं लागल्यामुळे शिवपुरी नि परिसर दररोज अक्षरश: पालथा घालत असे हा गडी. मनोरथा चल त्या नगरीला, नगरी कसली भूलोकींचा स्वर्गच होता तो


त्यानंतर इन्दौर शहरीं पुन्हा वास्तव्य झाले त्याचे पुढची पंचवीस वरूषें. तिथे तो छानच रमला. इन्दौरबद्दल फार सेन्सिटिव्ह आहे तो बरं का. कुणी इंदूरचे नाव जरी काढलं तरी तो अहमहमिकेने बोलत सुटतो कोणी त्याला  अडवेपर्यंत ! त्याच्या इन्दौर वास्तव्याचे किस्से म्हणजे कित्येक रिळें कागद फस्त करतील. म्हणून पुढच्या नगरांकडे वळूंया


खरं तर जस्ट टु कट् लॉन्ग स्टोरी शॉर्ट, त्याला कितीतरी डझन नगरें मनापासून आवडली, भूलोकींच्या अमरावती एव्हडी नसलीत तरी, अर्थात केवळ एक अपवाद - प्रशांति निलयम्चा ! मग ते लंडन असो, फ्लोरेन्स, वाई-महाबळेश्वर, इगतपुरी, शाजापूर, मैसूर, चित्रदुर्ग, पांवस, खामगांव आणि अर्थातच रग्बी ! ! 

प्रभू रहाळकर

जुलाब २०२५ 

लंडन.       


This page is powered by Blogger. Isn't yours?