Saturday, August 01, 2026

 

इंटीरियर डेकोपेशन ! आतली सजावट !

 इंटीरियर डेकोरेशन - आतली सजावट


माझ्या तीर्थरूपांना घरातली सजावट अधून मधून बदलण्याची हौस होती. अगदी दौऱ्यावर असतांना देखील तेथील डाकबंगल्यात ते सर्वप्रथम पूर्व-पश्चिम अशी भिंत किंवा कोपरा पाहून तिथे एक टेबल लावायला सांगत, त्यावर स्वच्छ शुभ्र टेबल क्लॉथ अंथरून आधी गणपती, दत्तात्रेय  आणि त्यांच्या मातोश्रींचा सुरेख नक्षीकामाची लांकडी फ्रेम असलेली तसबीर जमवून ठेवीत. तिथल्या बागेतील सुंदर फुलें वेचून या तिन्ही तसबिरींना छानपैकी सजवत असत आणि मगच चहाफराळ वगैरे सोपस्कार सुरू होत

मला आणि ताईला आमच्या घरीं स्वतंत्र खोल्या होत्या आणि आपापली खोली स्वच्छ नि नीटनेटकी ठेवण्यावर वडिलांचा कटाक्ष असे. आम्ही दोघे आपापल्या खोल्या अधूनमधूनस्वॅपकिंवा अदलाबदल करत असूं. कपाटे मात्र वह्यापुस्तकें आणि कपड्यांनी चक्ककोंबलेलीं’ ! असो

माझ्या मुलांनाही घराची छान सजावट करण्याची जणू चढाओढ असते. मी मात्र हल्ली हल्ली ते वरचेवर करीत असतो हे तुम्ही पाहिले आहेच. माझा तो सांप्रतचा विरंगुळा म्हणा हवं तर

तथापि मला आज याइंटीरियर डेकोरेशनकिंवा आतली सजावट यावर जरासे वेगळे भाष्य करायचे आहे. मंडळी, मागे मीमिल्यू इंटीरियरकिंवा शरीराच्या अंतरंगातल्या वातावरणाचे शरीर-शास्त्रानुसार केलेले वर्णन तुम्हाला कदाचित् आठवत असेल. आज जरा शरीराच्याही कितीतरी आंत, अगदी प्राणमय मनोमय विज्ञानमय नि आनंदमय कोषांच्याही पलीकडे जे काहीअसेल’, त्यावर विचार करीन म्हणतो. वास्तविक या पंचकोषांच्या अलिकडे, पलीकडे आणि सबाह्यअंतरंग व्यापून असलेले एकुलते एक परब्रह्मच वसत असले तरी ते पंचकोष सुद्धा समजून घ्यायला हवेच ना

डोन्ट वरी, त्यांवर खूप काही सांगायची माझी पात्रता नाही म्हणून त्यांना चक्क बगल देऊन मी असे म्हणेन की जेवढी बाह्य सजावट महत्वाची त्याहून कितीतरी पटींनी अधिक अंतर्गत सजावट विशेष महत्वाची

काही अतिशय जुजबी, किरकोळ बाबी असतात पण त्यांचेकडे जाणीवपूर्वक पाहता आले तर आपले व्यक्तिमत्व हवेहवेसे घडू शकेल. कोणालाही प्रसन्न हसरा चेहराच पाहावासा वाटतो, दुर्मुखलेला त्रासिक रागीट चेहरा कुणालाच आवडत नाही. मात्र चेहऱ्यावर विलसणारे प्रसन्न हास्य हे आतल्या सजावटीचे प्रतिबिंब असते हे विसरून चालणार नाही. बळेबळें हंसणे हे निव्वळ नाटक होय हे कुणाच्याही सहज लक्षात येते. माऊलींची एक झकास ओंवी आहे - ‘देखें अखंडित प्रसन्नता, आथि जेथ चित्तां, तेथ संसार-दु:खां समस्तां, ठाव नाही’ ! दुसरे कुणी म्हटलंय्- ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सुखासी कारण’ ! मनाची प्रसन्नता हेच ते इंटीरियर डेकोरेशन

आतां, हीप्रसन्नताकशी मिळवायची, कुठे मिळेल ती ? नो, ती मिळवायची नसून ती आपसूक प्रकट होईल, जेव्हा माझ्या मनात ठाण मांडून बसलेल्या सहा शत्रूंना एकएक करीत हद्दपार करीन तेव्हाच ! त्या बेट्यांना नेस्तनाबूत करण्यासाठीच तर आपण विविध साधनांच्या मागे लागतो ना ! ते सर्व एकेक करीत बाहेर पडत गेले की प्रसन्नता, शांती, प्रेमाचा घडा हळूहळू भरूं लागेल जो निव्वळ चेहऱ्यावर दिसतां आसमंत व्यापू शकेल

त्या षडुरिपूंचा कबाडा बाहेर टाकून आपापले अंतरंग छानपैकी सजवणे, एम्बेलिश करणे हाच मूळ परमार्थाचा भक्कम पाया होय

रहाळकर

ऑगस्ट २०२६      



Thursday, July 30, 2026

 

गावाकडचं जोशी कुटुंब !

 गावाकडचं जोशी कुटुंब ! 

आज समोरच्या वहिनी सज्जनगढ, चाफळ, शिवथरघळला भेट देऊन तिथला सर्व वृत्तांत आम्हाला रसाळपणे सांगत होत्या. जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी पाहिलेला सज्जनगढ पुन्हा नजरेसमोरून झरझरत गेला आणि आतां तिथे असलेल्या सोयी-सुविधा ऐकल्यावर तर अधिकच संतोष वाटला. बोलण्याच्या ओघात त्या काळातील खेडोपाड्यांचा ओझरता उल्लेख आला आणि समजले की वहिनी मूळच्या मुदखेड या लहानशा गांवच्या. वडिलोपार्जित जमीनजुमला, मोठे कुटुंब आणि त्या वेळचे एकंदर राहणीमान ऐकताना मी अगदी तल्लीन झालो होतो

तो सर्व वृत्तांत ऐकताना त्या काळातले सोंवळे-ओंवळे, जातीजातीतील तफावत आणि एकंदर स्पृश्यास्पृश्य वर्णन ऐकतांना अंगावर शाहारे आले, खूप बेचैन वाटले. आमचे बालपण शहरांत गेले असल्याने आणि आमचे एकंदर कुटुंब बऱ्यापैकी शिक्षित दीक्षित नि प्रगतीशील असल्याने वरील वृत्तांत जरासा विषण्ण करणारा निघाला


तथापि त्या काळी सहज दृग्गोचर होणारी संवेदनशीलता, सौहार्द्र आणि कुणालाही मदतीचा हात देणारे संस्कार खेड्यापाड्यांनी कसोशीने जपले हे आपल्या सांस्कृतिक वारश्याचे ठसठशीत प्रमाण आहे. जोशी आणि चौधरी ही घराणीं त्यामानाने अधिक सुशिक्षित आणि सन्माननीय, तर इतर बहुजनसमाज त्या मानाने बराच मागे राहिला. अर्थात सुविद्य समाजाला शहरांची ओढ वाटणे साहाजिकच होते कारण तिथे खूप संधी उपलब्ध असत. या शहरीकरणाने खेडीं मात्र ओसाड पडू लागली आणि आपले गतवैभव हळूहळूं नष्टप्राय होत नवश्रीमंतांची संख्या शहरांपुरती मर्यादित झाली. हे सर्व तुम्हाला माहीत असूनही मी पुन्हा सांगतोय् कारण त्यामुळे मला वाटणारे वैषम्य थोडेतरी कमी व्हायला मदत होईल मलाच. त्याचं असं आहे की मनात आलेले कुणाला तरी सांगितल्यावर फार हलकं हलकं वाटतं बघा

रहाळकर

३० जुलाय २०२६.   


This page is powered by Blogger. Isn't yours?