Wednesday, June 24, 2026
भज गोविन्दम् !
भज गोविन्दम् !
श्रीमत् शंकराचार्यांनी ‘माया’नदी इतक्या सहजपणे ओलांडली जसे कोणी एखाद्या शेतावरील बांध्याला ओलांडून जावे ! त्यांनी वेदान्तावर अमाप लिखाण केले ज्यांत त्यांनी ‘स्व’ किंवा आत्म्याबद्दलचे ज्ञान प्रसृत करत असतानाच असंख्य स्तोत्रें देखील रचली. सर्वसामान्य लोकांत भक्तीचे बीज रूजावे म्हणून त्यांनी रचलेली स्तोत्रें मानवी समाजासाठी एक मोठी सेवा म्हणता येईल. यांतील एक - ‘भज गोविन्दम्’ हे स्तोत्र त्याचे उत्तम उदाहरण होय.
काही विद्वान मंडळींना वाटते की भक्तिमार्ग हा ज्ञानमार्गापासून अगदी वेगळा आहे आणि त्यासाठी ते आपली मतें हिरिरीने मांडत आलेली आहेत, होय अजूनही. मात्र खरे सांगायचे तर बुद्धिज्ञान जेव्हा परिपक्व होऊन हृदयांत स्थिरावते तेव्हाच ते ‘शाहाणे’ अर्थात ‘वाईज’ म्हटले जाते ( एऱ्हवीं ‘अदरवाईज’ ! ) . असो.
शाहाणे झालेले शहाणपण जेव्हा दैनंदिन जीवनात मूर्त स्वरूपात दृग्गोचर होते तेव्हा त्यालाच ‘भक्ती’ हे नामाभिधान देतां येईल. जे ज्ञान भक्तींत परिणत होत नाही ते व्यर्थ होय असे संत सांगतात.
श्रीमत् शंकराचार्य सांगतात की जोंवर ‘इंद्रिय-निग्रह’ साधत नाही तोंवर खरे ज्ञान, शहाणपण हृदयांत स्थिरावणार नाही. तर मग हा इंद्रियनिग्रह प्रत्यक्षात कसा आणता येईल ? थिरूवलुवर या महान तमिळ संतांनी ‘विचाराला’ ‘कृतींत’ कसे परावर्तित करता येईल याची युक्ती सांगितली आहे. ते म्हणतात — ईश्वराप्रत तुमची आसक्ती एवढी एकच आसक्ती बाळगा; त्या आसक्तिद्वारें इतर सर्व वासनांपासून तुम्ही मुक्त राहूं शकता. नाम्मलवर नावाचा दुसरा संत म्हणतो, ‘आसक्ती सोडली तर मोक्ष खात्रीने ठरलेलाच’ !
श्रीमद्भगव्द्गीतेंत हेच नाही का म्हटले, ‘विषयान् विनिवर्तंते निराहारास्य देहिना: रसवर्जम् रसोप्यस्य परम् द्रष्ट्वा निवर्तते’ !
तर मग आसक्तींचा मनापासून समूळ नाश आणि मनाला ईश्वराकडे वळवणे हाच एकमेव इंद्रियनिग्रहाचा मार्ग आहे !
अजून एक तमिळ संत म्हणतो, ‘मी ज्या दुराग्रही शत्रूला जिंकायचा पराकाष्ठेने प्रयत्न करत होतो तो मार्ग म्हणजे ‘प्रेम’ हे ‘त्या’ने मला शिकवले, असे संत माणिक्कावाचागर म्हणतात. आणि हे दुराग्रही शत्रू कोण म्हणाल तर ते आहेत अहंकार नि वासना !
श्रीमत् आदिशंकराचार्य, ज्यांनी एक ओंजळभर घोटांत आख्खा ज्ञानसागर प्राशन केला असे म्हटले जाते, त्यांनी अशी स्तोत्रें गायिली ज्यांत ज्ञान आणि भक्तीचा विलक्षण संयोग आढळून येईल. खरंतर श्रीशंकरांच्या ‘भज गोविन्दम्’ या गीतांत वेदान्ताचे सार आले आहे. खरोखर हे गीत विलक्षण गेय आहे, सुमधुर, मेलोडियस् ! भारतरत्न एम् एस् सुब्बुलक्ष्मींनी ते छानच गायिले आहे नै ?
या स्तोत्रांत एकूण एकतीस श्लोक असले तरी ते सर्व सहसा गात नाहीत कोणी, केवळ सहा सात श्लोक म्हटले जातात. ‘क्रमश:’ वगैरे भानगडींत न अडकता जमतील तेवढेच श्लोक अभ्यासार्थ घेणार आहे…….! (अर्थात सर्व श्लोकांचा निचोड द्यायचा अवश्य प्रयत्न करीन. आजही प्रास्ताविकच खूप लांबले की महाराजा ! )
१) “भज गोविन्दं भज गोविन्दं
भज गोविन्दं मूढमते ।
संप्राप्ते संन्निहिते काले
नहि नहि रक्षति डुंक्रुंकरणे ॥१॥”
आपल्या अत्यंत लाडक्या अशा शंकराचार्यांसाठी देवी सरस्वती शारदा जणू स्वत:च हे गीत गाते आहे !
मृत्यूच्या दारापाशी उभा असताना तूं आजवर वाचलेले ग्रंथ, मिळवलेले भौतिक ज्ञान, प्रयत्नसाध्य कौशल्य वगैरे तुझ्या कितपत उपयोगाचे असणार आहे ? नव्हे, नक्कीच नाही ! केवळ ईश्वराला, गोविन्दाला शरण गेलास तरच तुझा निभाव लागेल. मृत्यूचे दूत तुला खुणावून आपल्याकडे ओढायचा प्रयत्न करतील तेव्हा तू मिळवलेले सर्व ऐहिक ज्ञान आणि कौशल्य तोकडे पडेल, कोणीच मदत करू शकणार नाहीत. केवळ एक गोविन्दच तुला तारून नेईल. तुझे सर्व पुस्तकी ज्ञान निखळ भक्तीविना निरुपयोगी असेल..
खरोखर, अनेक भ्रांत समजुतींत विद्वत्तेचा अहंकार फार मोठा आहे. शंकराचार्य म्हणतात की विद्वत्तेचा माज आणि त्या पाठोपाठ येणाऱ्या कीर्तीची हांव ही मोठी भ्रांती होय. मात्र ईश्वरावरील प्रेममय भक्ती त्या भ्रांतीला नेस्तनाबूत करू शकते.
‘डुंकुंकरणे’ हा पाणिणीच्या व्याकरणातील एक म्हणण्याचा प्रकार आहे, घोकंपट्टी सारखा. शंकराचार्य चेष्टेने म्हणतात की निव्वळ घोकंपट्टी करून मृत्यू टाळता येईल काय. वास्तविक हा कटाक्ष सर्व विद्वद्जनांसाठी आहे हे तुम्ही ओळखले असेलच म्हणा. नुसते पुस्तकी ज्ञान निरुपयोगी असून भगवद्भक्तीची जोड नितांत आवश्यक असल्याचे संपूर्ण काव्यांत प्रतिपादन आहे.
दुसऱ्या श्लोकात संपत्तीच्या हव्यासावर ताशेरे ओढतात. -
२). “मूढ जहीहि धनागमतृष्णा
कुरू सग्बुद्धि मनसि विकुष्णाम् ।
मल्लभसे निजकर्मोपात्तं
वित्तं तेन विनोदय चित्तम् ॥”
भज गोविन्दम् हे गीत प्रत्येक माणसासाठी, अगदी रस्त्यावरच्या निर्धन अडाणी माणसापासून सर्वांसाठी उपयुक्त आहे. भक्ती आणि ज्ञान हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अघिकार आहे. श्रीमत् शंकराचार्यांची शिकवण केवळ संन्यासी मंडळींसाठी नसून सर्वसामान्यांसाठी आहे. स्व-कष्टाने मिळालेल्या संपत्तीवर ज्याचात्याचा पूर्ण हक्क आहे, तो त्याचा कसाही उपयोग करो , मात्र त्यात त्याचे समाधान आवश्यक आहे. मात्र अधिकाधिक संपत्ती मिळवायची हांव किंवा तृष्णा त्यांना मान्य नाही.
३). “नारीस्तनभरनाभीदेशं
दृष्ट्या मा गा मोहवशेम् ।
एतन्मांसवसादविकारं
मनसि विचिन्तय वारं वारं ॥३॥”
या श्लोकात स्त्रीदेहाचे वर्णन असून लंपटपणा टाळण्यासाठी त्याकडे काम-वासनेने पाहू नये असे सुचवले आहे, अर्थातच परस्त्रीकडे ! म्हटलेच आहे, ‘नजर चंचल तर मन चंचल’ ! !
चौथ्या श्लोकात कमळाच्या पानांवर थरथरणाऱ्या पाण्याच्या थेंबांचे रूपक सांगतात. मानवी जीवन अगदी तसेच अस्थिर, अशाश्वत, क्षणभंगूर असल्याचे सांगतात.
पांचव्या श्लोकात म्हणतात की जोंवर तुम्ही धनदौलतीचे स्वामी आहांत तोपर्यंतच सगेसोयरे, इष्टमित्र, नोकरचाकर तुमच्याकडे लक्ष देतील आणि ते संपताच कोणी ढुंकूनही पाहणार नाही तुमच्याकडे ! आणि म्हणून शंकराचार्य सांगतात की सर्व ऐहिक, क्षणभंगूर वस्तूंचा नाद सोडून गोविन्दाचे चरणांचा ध्यास धरा !
सहाव्या श्लोकात म्हणतात की जो पर्यंत श्वासोच्छ्वास चालतोय तोंवरच पत्नी, मुलें, सगेसोयरे तुमच्या आजूबाजूस दिसतील. मात्र तो थांबतांच प्रेत म्हणून घराबाहेर काढायची लगबग करतील ! खरंतर त्या प्रेताला पत्नी उंबरठ्यापर्यंत पोंचवील, मुलें नि सगेसोयरे स्मशानापर्यंत आणि अग्नी चितेपर्यंतच ! पुढचा प्रवास फक्त गोविन्दाच्याच संगतींत असणार आहे !
सातव्या श्लोकात म्हणतात की बालपण खेळण्यांत निघून जाईल, तारूण्य नासले, वार्धक्यात आजार नि चिंतांनी बेजार केले. तथापि स्वत:ला जाणून घेण्याचा कुणीच प्रयत्न केला नाही !
आठव्यात विचारतात की जिच्यावर तू अतोनात प्रेम केलेस ती पत्नी कोण, पुत्र कोण, आणि ज्याला जिवापाड जपत आलास तो तू स्वत: कोण ? हा संसार खरोखर मायाबाजार आहे. कुठून आलास तू नि कुठे जाणार ?
नवव्यात म्हणाले सत्संग आणि सत्यसंगाची कास धरली तर अनेक वासनांवर विजय मिळवता येतो, मन:शांतीचा लाभ होतो. मुख्यत: भ्रांती दूर होते. हा श्लोक उधृत करायलाच हवा !
“सत्संगत्वे नि:संगत्वं
निस्संगत्वे निर्मोहत्वं ।
निर्मोहत्वे निश्चलचित्तं
निश्चलत्वे जीवनमुक्ति: ॥९॥”
तसे पाहिले तर अजून एकतिसाव्या पर्यंत वाटचाल करायची आहे, पण तुम्ही कंटाळला असाल ना एव्हाना, म्हणून थांबतो !
रहाळकर
२४ जून २०२६.