Friday, August 14, 2026
कृतिशील संवेदनशीलता !
कृतिशील संवेदनशीलता !
माणसांत एक विलक्षण सद्गुण दिलाय ईश्वराने नि तो म्हणजे संवेदना. इतरांचे दु:ख, कष्ट, अभाग्य पाहून आपल्याला सहानुभूती जाणवते. मात्र तसे होत असताना आपण कधी नुसतेच हळहळतो, कधी धीराचे दोन शब्द वापरतो तर क्वचित् कधी मदतीसाठी पुढे सरसावतो. या तिसऱ्या प्रकाराला मी कृतिशील संवेदनशीलता म्हणेन.
खूप पूर्वीं मी विभागप्रमुख म्हणून कारर्यभाग स्वीकारल्यावर आधीचे काही दिवस निरनिराळ्या ठिकाणीं आकस्मिक भेटी देत तिथली कार्यपद्धती, उणीवा आणि तेथील कर्मचार्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याचा निरंतर प्रयास करीत असे.
एकदा मुळा नदीतील वाटर-हायसिन्थ अर्थात कर्णफुटीच्या अफाट जंगलाला हातांनी काढण्याच्या महापालिकेच्या बिगारी कर्मचाऱ्यांचे काम प्रत्यक्ष पाहिले. जवळजवळ शंभर बिगारी कामगार पाण्यांत उतरून त्या वेली उपटतांना पाहिले. त्याचवेळीं खरेतर जरासे पुढे आर्मीच्या मेकॅनाईज्ड नावा तेच काम यंत्राच्या साहाय्याने करताना पाहून अचंभित झालो. महापालिकेचे शंभर बिगारी आणि आर्मीच्या दोनच नावा तेच काम आपापल्या हद्दींत करत होते. मी परत ऑफिसात आल्यावर माझा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला, मात्र तो कार्यान्वित होण्यात बराच वेळ खर्ची जाणार हे पाहून त्याच दिवशीं स्टोअर ऑफिसरला भेटून सर्व बिगारी कामगारांसाठी गम् बूट आणि जाड रबरी हातमोज्यांची मागणी नोंदवली. तिसऱ्याच दिवशी सर्व साहित्य त्या कर्मचार्यांत वाटले गेले आणि पुढे त्यांचे काम थोडेसे सोपे झाले.
हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की दुसऱ्यांचे कष्ट पाहून वरवरची सहानुभूती न दाखवतां प्रत्यक्ष कृतिशील संवेदना अधिक महत्वाची ठरते !
आपल्या दैनंदिन जीवनांतही आपण प्रत्यही काबाडकष्ट करणारे, दोन वेळचे पोट भरण्याासाठी वणवण करणारे, शरीराने पंगु किंवा थकलीभागलेली माणसें पाहात असतो. त्यांच्याबद्दल कणव नि सहानुभूती वाटणे साहाजिक असले तरी निदान त्यांचा उपमर्द, अपमान तर कळत न कळत करत नाही ना इकडे लक्ष देणे आवश्यक नाही काय ? स्वामींनी फारच थोडक्या शब्दांत सांगितलंय्, ‘हेल्प एव्हर-हर्ट नेव्हर’ ! मदतीसाठी नेहमी तत्पर असा पण निदान कुणाला दुखवूं तरी नका.
मला वाटतं हीच ती ‘कृतिशील संवेदनशीलता’ ! !
रहाळकर
१३ ऑगस्ट २०२६
Wednesday, August 12, 2026
ज्योती-ध्यान !
ज्योती-ध्यान !
प्रत्येक भारतीयाला ध्यान-धारणा हे शब्द नवीन नसतात आणि त्यांतील काही मंडळी त्या ध्यानधारणेचा पाठपुरावा करीतही असतात. कित्येकांना त्याबद्दल निव्वळ कुतुहल असते म्हणून ते जाणकार व्यक्तींचे मार्गदर्शन वगैरे घेऊ पाहतात. वास्तविक ध्यानाच्या ‘टेक्निक’ चे अनंत प्रकार आहेत. प्रत्यक्ष ध्यानाचा अनुभव ज्याने त्यानेच घ्यावयाचा असतो आणि तो आनंद प्रत्येकाचा अगदी वैयक्तिक असतो, तो शब्दांतून सांगता येत नाही.
स्वामींनी अगदी बालवयातही ध्यानाचा अनुभव घेण्यासाठी त्यांच्या बालविकास वर्गांतून ‘ज्योती-ध्यान’ कसे करता येईल याचा सोपा वस्तुपाठ दिला होता. मला वाटतं तो सर्वांनाच आचरतां येण्यासारखा आहे, नव्हे, तो अनुभव एकदा तरी प्रत्येकाने घ्यायला हवा असे माझे प्रांजळ मत आहे.
ज्ञानेश्वरीत एक छान ओंवी येते मनाच्या एका पैलूबद्दल, माऊली सांगतात की जेव्हा मनाला एखाद्या विषयाची गोडी लागते तेव्हा तो अनुभव पुन्हापुन्हा घेण्यासाठी मन ‘सोकावते’ !
अगदी तसेच एकदा ‘ज्योती-ध्यान’ छानपैकी ‘जमले’ तर तो अनुभव वारंवार घ्यावासा वाटतो ! करून तर पहा एकदा तरी.
कोणत्याही वेळीं, जमल्यास पहांटेच्या प्रहरीं - शांत निवांत जागीं बसावें, समोर एक समई, निरांजन, पणती किंवा गेलाबाजार मेणबत्ती प्रज्वलित करावी, शक्यतों ती ज्योत स्थिर राहील असा ‘निर्वातींचा दीपु’ असावा, त्या ज्योतीकडे काही क्षण अनिमिषपणे पाहात राहावे त्राटक केल्यासारखे नि मग अलगद डोळे मिटून तीच ज्योत आपल्या भ्रूमध्यात म्हणजे दोन्ही भुंवयांच्या मधोमध स्थिरावली असल्याची मनोमन कल्पना करावी. ती तिथे स्खिरावल्यानंतर मनोमन तिला आपल्या हृदयापर्यंत आणावी, तेथून सर्व अंगप्रत्यंगांत फिरवल्यावर आपल्या टाळूपर्यंत आणावी आणि तेथून ती दिव्य ज्योत हळूहळू आसमंतांत फांकत जात असल्याचा मनोमन अनुभव घ्यावा, आपण स्वत: नि मित्रगोत्र आप्तस्वकीय इतकेच नव्हे तर असले नसलेले शत्रूही त्या दिव्य प्रकाशांत न्हाऊन निघत आहेत असे मनोमनीं पाहात राहावे आणि त्या पसरलेल्या प्रकाशांत आपण न्हाहून निघत असल्याचा आनंद घेत राहावा. ……!
ही सर्व प्रक्रिया कुणी काही मिनिटांत अनुभवेल तर कुणी कितीही वेळ. सर्वेत्र सुखिन: सन्तु या प्रार्थनेने या ज्योती-ध्यानाची सांगता करावी.
इति शम् !
रहाळकर
१२ ऑगस्ट २०२६ ( दीप अमावस्या ! )