Monday, August 17, 2026

 

शिवदिनकेसरी !

 शिवदिनकेसरी

शिवदिनकेसरी हे महाराष्ट्रातील पैठणचे संतकवी होऊन गेले असले तरी हे नाव मी प्रथम ग्वाल्हेरच्या श्रीढोलीबुवा महाराजांच्या कवनांतून ऐकले होते. आज कुठेतरी हे नाव पुन्हा कानांवर पडले आणि या संतकवींबद्दल तुम्हाला अवगत करून द्यावेसे वाटले

मंडळी, तुम्ही कदाचित्विंचू चावला विंचू चावला विंचू चावला हो !’ हे भारूड ऐकले असेल बालपणी. त्या भारूडाचे रचयिता म्हणजे शिवदिनकेसरी

वास्तविक ते नाथपंथीय आणि त्यांचे नाव होते शिवदिननाथ. त्यांचे सद्गुरू होते संत केसरीनाथ म्हणून त्यांनी आपले नामाभिघान शिवदिनकेसरी असे केलेसद्गुरूंवर नितांत प्रेम आणि अढळ श्रद्धा असलेल्या या संतकवीने केलेली गुरुवंदना चिरस्मरणीय राहील - ‘तो नयनांत वसेल जेव्हा, जग गुरूब्रह्म दिसेल तेव्हा’ !

योगमार्ग आणि भक्तिमार्गाचा सुरेख समन्वय त्यांच्या विपुल वांग्मयातून दृग्गोचर होतो.

विंचू चावलाया भारूडाव्यतिरिक्त त्यांनी अनेक पदें, अभंग आणि भक्तिज्ञानावर आधारित ग्रंथांची निर्मिती केली. एकवीस अध्यायी ज्ञानप्रदीप हा ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जवळजवळ पाचशे पदांचा संग्रहदेखील प्रचलित आहे

विंचू चावलाया भारूडातील विंचू म्हणजे अवांच्छित वासना, देहबुद्धी वगैरे विषारी नि विलक्षण क्लेश देणाऱ्या इंगळ्या होत हे तुमच्या चाणाक्ष नजरेतून सुटले नसेलच म्हणा ! ! 

रहाळकर

१७ ऑगस्ट २०२६ 


Sunday, August 16, 2026

 

पॉकेट कॅफे !

 पॉकेट कॅफे

गेले पाचसहा दिवस लेकीकडे जाऊन, तूपरोटी खाऊन, (अधिकच) धष्टपुष्ट होऊन आज पुन्हा बावधन महानगरांत स्थानापन्न जाहलो. तळेगाव नजिकचे तिचेसुकूननिवासस्थान खरोखरच खूप खूप सुकून देणारे, चित्तवृत्ती उल्हसित करणारे आणि जगातल्या सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे आहे. विश्वास बसणार नाही कुणाचा पण तिथे चक्क बोचरी थंडी होती अगदी पाचगणी महाबळेश्वर सारखी. सतत पावसाळी हवामान, सर्वदूर हिरवेगार, नव्हे हिरव्याच्या कित्येक छटा पाहून मन नि डोळे तृप्त तृप्त झाले. घरीं ददुकल्ल्या मदुकल्ल्या चरणे चालू असतानाच नजिकच्या कित्येक नवीन फूड-जॉईंट्सवरही चांगलाच डल्ला मारला गेला. किती किती आठवडे आम्ही घराबाहेर पडत नसल्याने जांवईबापूंनी पवनेच्या खोऱ्यांत मनसोक्त फिरवून आणले. दुपारी अस्सल गावरान पिठलंभाकरीचा लुत्फ उठवल्यावर संध्याकाळी गेलोपॉकेट कॅफेत, या लेखाच्या शीर्षकस्थानीं ! ओह, दॅट हॅपन्न्ड टु बी दि आयसिंग ऑन केक. सुपर्ब, खूप खूप आवडली ही कॅफे. मुळांत माझ्या आवडीची सगळी सगळी कॉन्टिनेंटल व्यंजने, शुद्ध शाकाहारी आणि विलक्षण चविष्ट ! खरंतर म्हणूनच तुम्हाला चिथावणी देतोय् या छोट्याशा स्फुटातून, पहा जमलं तर घ्या तुम्हीही तो अनुभव. कुठेसं आहे विचारताय् ? अहो, तळेगाव शहरात शिरण्यासाठी जी मोठी कमान लागते ना, त्याच कोपऱ्यावर. लहानशी टुमदार पण उत्तम ॲम्बियन्स भेटेल तुम्हाला आत शिरताच. तिचा मालक आहे एक अतिशय उमदा, मनमोकळा, उच्चशिक्षित तरूण, पाच वर्षें अमेरिकेत वास्तव्य करून आलेला. कॅफेतील व्यंजनांचा आनंद तर मिळालाच पण या तरूणाशी झालेले अल्प संभाषणही सुखावून गेले ! यस्, मी मनापासून शिफारस करीन या कॅफेची ! ! 

रहाळकर

१६ ऑगस्ट २०२६ 


Friday, August 14, 2026

 

कृतिशील संवेदनशीलता !

 कृतिशील संवेदनशीलता

माणसांत एक विलक्षण सद्गुण दिलाय ईश्वराने नि तो म्हणजे संवेदना. इतरांचे दु:, कष्ट, अभाग्य पाहून आपल्याला सहानुभूती जाणवते. मात्र तसे होत असताना आपण कधी नुसतेच हळहळतो, कधी धीराचे दोन शब्द वापरतो तर क्वचित् कधी मदतीसाठी पुढे सरसावतो. या तिसऱ्या प्रकाराला मी कृतिशील संवेदनशीलता म्हणेन


खूप पूर्वीं मी विभागप्रमुख म्हणून कारर्यभाग स्वीकारल्यावर आधीचे काही दिवस निरनिराळ्या ठिकाणीं आकस्मिक भेटी देत तिथली कार्यपद्धती, उणीवा आणि तेथील कर्मचार्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्याचा निरंतर प्रयास करीत असे

एकदा मुळा नदीतील वाटर-हायसिन्थ अर्थात कर्णफुटीच्या अफाट जंगलाला हातांनी काढण्याच्या महापालिकेच्या बिगारी कर्मचाऱ्यांचे काम प्रत्यक्ष पाहिले. जवळजवळ शंभर बिगारी कामगार पाण्यांत उतरून त्या वेली उपटतांना पाहिले. त्याचवेळीं खरेतर जरासे पुढे आर्मीच्या मेकॅनाईज्ड नावा तेच काम यंत्राच्या साहाय्याने करताना पाहून अचंभित झालो. महापालिकेचे शंभर बिगारी आणि आर्मीच्या दोनच नावा तेच काम आपापल्या हद्दींत करत होते. मी परत ऑफिसात आल्यावर माझा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला, मात्र तो  कार्यान्वित होण्यात बराच वेळ खर्ची जाणार हे पाहून त्याच दिवशीं स्टोअर ऑफिसरला भेटून सर्व बिगारी कामगारांसाठी गम् बूट आणि जाड रबरी हातमोज्यांची मागणी नोंदवली. तिसऱ्याच दिवशी सर्व साहित्य त्या कर्मचार्यांत वाटले गेले आणि पुढे त्यांचे काम थोडेसे सोपे झाले

हे सर्व सांगायचा उद्देश एवढाच की दुसऱ्यांचे कष्ट पाहून वरवरची सहानुभूती दाखवतां प्रत्यक्ष कृतिशील संवेदना अधिक महत्वाची ठरते

आपल्या दैनंदिन जीवनांतही आपण प्रत्यही काबाडकष्ट करणारे, दोन वेळचे पोट भरण्याासाठी वणवण करणारे, शरीराने पंगु किंवा थकलीभागलेली माणसें पाहात असतो. त्यांच्याबद्दल कणव नि सहानुभूती वाटणे साहाजिक असले तरी निदान त्यांचा उपमर्द, अपमान तर कळत कळत करत नाही ना इकडे लक्ष देणे आवश्यक नाही काय ? स्वामींनी फारच थोडक्या शब्दांत सांगितलंय्, ‘हेल्प एव्हर-हर्ट नेव्हर’ ! मदतीसाठी नेहमी तत्पर असा पण निदान कुणाला दुखवूं तरी नका.

मला वाटतं हीच तीकृतिशील संवेदनशीलता’ ! !

रहाळकर

१३ ऑगस्ट २०२६ 


This page is powered by Blogger. Isn't yours?