Thursday, January 15, 2026
सिव्हिक सेन्स वगैरे !
सिव्हिक सेन्स, सद्भाव, सदिच्छा वगैरे !
काल परवां देवेन्द्र फडणविसांच्या जवळजवळ सर्व मुलाखती लक्षपूर्वक पाहिल्या आणि त्यातील एक प्रश्न मनात ठाण मांडून बसला. प्रश्न साधा सोपा असला तरी अंतर्मुख करणारा आहे खरा. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पंचाहत्तर वर्षे उलटूनही आपण अजून सामाजिक व्यवहारदृष्ट्या मागासलेले, बुरसटलेले का आहोत ; साधेसुधे शिष्टाचार आपल्यात का रूजले नाहीत ; सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठा अजून एवढी दूर कां वगैरे प्रश्न काही केल्या पिच्छा सोडायला तयार नाहीत आणि म्हणून वाटलं यांवरच जरासे चिंतन व्हावे.
शालेय शिक्षणात आपल्या सर्वांनाच नागरिक-शास्त्र हा विषय असे. त्यांतील लोकसभा राज्यसभा वगैरे भाग सोडले तर वैयक्तिक जीवन आणि समाज जीवन यांवर थोडेबहुत शिकवले जाई हे खरे असले तरी त्याचा अंमल प्रत्यक्ष वागणुकीत अभावानेच आढळत राहिला. विशेषकरून पाश्चात्य किंवा प्रगत देशांत थोडे जरी वास्तव्य घडले तर आपल्यातील ही उणीव प्रकर्षाने जाणवते. अगदी सहज सोपे वाटणारे वाहतुकीचे नियम आपण किती सर्रासपणे पायदळीं तुडवतो. साधं वन् वे ट्रॅफिक किंवा सिग्नलवरचा लाल दिवा न जुमानतां आपापली वाहने बिनदिक्कत घुसवतो. पादचारी क्रॉसिंगचा अभावाने वापर करतो आणि चक्क आपली वाहने त्यांवरच उभी करतो ! इतस्तथा कचरा टाकणे नि कुठेही पिंक टाकणे किती सहज घडते नाही ? वाहन चालवताना वारंवार लेन बदलणे, सतत हॉर्न वाजवणे, वाटेल तसे ओव्हरटेक करणे, वेगमर्यागेचे वारंवार उल्लंघन वगैरे कितीतरी वाईट नि चुकीच्या संवई अजूनही घालवू शकत नाही आपण. पादचारी पथ ( फूटपाथ ) छान अवस्थेत असो वा नसोत, ते वापरणे कमीपणाचे वाटते ना बहुतेकांना ? ट्रॅफिक नियम मोडणे हाच बहुतेक वेळा नियम झालाय् जणू.
बरं, ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तींशी कसे वागतो आपण वाटेत अचानक गाठ पडते तेव्हा ? साघं अभिवादन, हाय हॅलो म्हणणे दूरच, निव्वळ स्मितहास्य द्यायला काय अडचण असावी ? कुणी घरी आले असताना किंवा आपण कुठे गेलो असताना सतत फोन पाहात बसणे हा शिष्ठाचार नक्कीच नव्हे. संभाषण करतानाही समोरच्याचे आघी पूर्ण ऐकून घ्यावे इतके सुद्धा जमत नाही कित्येकांना आणि चर्चा करायचा प्रसंग असला तरी आपलेच म्हणणे खरे हा अट्टाहास कशापायीं ?
तशी ही यादी खूप मोठी करता येईल. केवळ वानगीदाखल काहींच्या उल्लेख केला. मुळात आपली वागणूक आपणच समजून घ्यायला हवी नि तींत योग्य तो बदल घडवून आणावा. सार्वजनिक स्वच्छतेबाबत इन्दौर गेली कित्येक वर्षें प्रथम क्रमांकावर आहे, मात्र ते सहजासहजीं घडलेले नाही. कायद्याचा बडगा, दंडात्मक कारवाई बरोबरच लोक-शिक्षण आणि जन-जागृती फार महत्वाची आहेत जिकडे आपली अजूनही पाठ आहे. यांत लवकरात लवकर लक्ष घालणे अगत्याचे आहे असे वाटले म्हणून हे दीर्घ निवेदन ! क्षमस्व ! ! ( अरे हो, ते सद्भाव, सदिच्छा राहूनच गेले की राव ! )
रहाळकर
१५ जानेवारी २०२६
Tuesday, January 06, 2026
श्रीगणेशाय नम: !
श्री गणेशाची वांग्मयीन मूर्ती !
गेले कित्येक दिवस ज्ञानेश्वरीतल्या पहिल्याच अध्यायातल्या ओंवी क्र. तीन ते वीस पर्यंतच्या ओव्यांनी मला व्यग्र करून सोडले होते. त्या ओंव्यांचा गूढार्थ समजावून सांगण्यासाठी तुम्हांसकट कित्येकांना विनंती करत होतो मी वारंवार. अखेर एका ज्येष्ठ भगिनीने ती व्यग्रता बहुतांश स्वरूपात दूर केली.
श्रीगुणेशाचे हे वेगळे स्वरूप न्याहाळत असतांना माऊली कोणत्या भावावस्थेत असतील असा माझा सवाल होता. त्यांचे अतिशय चपखल आणि सहज कळेल असे निवेदन वाचताना माझ्या बऱ्याच क्वेरीज थंडावल्या. अर्थात अजून कित्येक आहेतही, मात्र ते नंतर पाहूं. आधी मला भेडसावणाऱ्या ओंव्या पुन्हा एकदा नजरेखालून घालूंया.
‘“हें शब्दब्रह्म अशेष । तेंचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३ ॥ स्मृति तेचि अवेव । देखा आंगिकभाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥ अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणे । पदपद्धती खेंवणें । प्रमेयरत्नांची ॥५॥ पदबंध नागर । तेंचि रंगाथिलें अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचे ॥६॥ देखा काव्यनाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रूणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥७॥ नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥८॥ तेथ व्यासादिकांच्या मती । तेचि मेखळा मिरविती । चोखाळपणें झळकति । पल्लवसडका ॥९॥ देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृती । म्हणौनि विसंवादें धरिती । आयुधें हातीं ॥१०॥ तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदान्तु तो महारसु । मोदकु मिरवे ॥११॥ एके हातीं दंतु । जो स्वभावतां खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥१२॥ मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरू वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥१३॥ देखा विवेकदंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥१४॥ तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥१५॥ मज अवगमलिया दोनी । मीमांसा श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥१६॥ प्रमेयप्रवालसुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसेपणें एकवटत । इभ-मस्तकावरी ॥१७॥ उपरि दशेपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदें । तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभतीं भलीं ॥१८॥ अकार चरणयुगुल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ॥१९॥ हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें । तें मियां श्रीगुरूकृपा नमिलें । आदिबीज ॥२०॥”
आतां, या ज्येष्ठ भगिनीने सांगितलेल्या श्रीगणेशाच्या स्वरूपाकडे माऊली ज्या वांग्मयीन दृष्टीने पाहतात आणि त्याच वेळी वेद-वेदांगांची कशी सांगड घालतात पहा.
श्रीगणेश म्हणजे विश्वव्यापक शुद्ध जाणीव, pure conscience, जे अंशत: प्रत्येक मनुष्याच्या मूलाधार चक्रात विद्यमान आहे-म्हटलेच आहे ना अथर्वशीर्षांत- ‘त्वं मूलाधार स्थितोसि नित्यं’. शिवाय या शुद्ध जाणिवेत माया अनुस्यूत आहेच म्हणून तिची विविध प्रकारे अभिव्यक्ती देखील होत राहते. चौदा विद्या, चौसष्ट कला वगैरे या गणेशतत्वांत दृग्गोचर होतात.
कित्येक संत महात्म्यांना श्रीगणेशाचे रूप सगुण साकार अथवा निर्गुण निराकार म्हणून भावले मात्र ज्ञानेश्वर महाराजांना ते वांग्मयरूप दिसले. मुळात शब्दप्रभू असलेले ज्ञानदेव श्रीगुणेशाला प्रथम अक्षर-रूपात पाहतात आणि ओंकाराचे तीन शब्द त्याची शरीर रचना विशद करतात. पुढे स्मृती म्हणजे वेद-वेदांग हे त्यांचे अवयव, काव्यपंक्ती त्यांचे हावभाव आणि अर्थ-सौंदर्य त्यांची ठेवण होय ! अठरा पुराणरूपी रत्नजडित अलंकार यांनी भूषविले आहेत, तर त्या रत्नांत दडून असलेले तत्व-सिद्धान्त आहेत आणि शब्दांची जडणघडण जणू त्यांची कोंदणे ! त्याचप्रमाणे ‘काव्य-प्रबंध’, काव्य-नाटकें वगैरे सर्व साहित्य प्रकार असून त्यांचा अर्थपूर्ण ध्वनी रूणझुणत आहे !
कोणत्याही साहित्य प्रकारांत ‘दर्शन’ किंवा तत्वज्ञान अतिशय महत्वाचा आहे म्हणून श्रीगणेशाला ते षड् दर्शनरूपी सहा हात असल्याचे ज्ञानदेव म्हणतात. बरे त्या भुजांत विद्यमान असलेली आयुधें देखील कशी विसंवादी आहेत ते अधोरेखित करताना सहाही आयुधाांचे वर्णन करताना त्यांचे मूल तत्व, जसे न्याय, तर्कशास्त्र, वेदान्त आणि सत्कारवादु अभयहस्त आहे जो जन्ममृत्यूच्या भयापासून मुक्त करणारा, आश्वस्त करणारा आणि म्हणून धर्मप्रतिष्ठा वृद्घिंगत करणारा आहे !
तेव्हा प्रचलित असलेल्या बौद्धमताचे खंडन करणारे प्रतीक म्हणून खंडित हस्तिदंत विचारात घेतला आहे.
त्यांना सरळ सोंड म्हणजे आत्मानात्म विशद करणारा शुद्ध विवेक दिसतो तर लहान डोळे ‘उन्मेष-सूक्ष्मणु’ अर्थात अतिशय तेजस्वी असे बारकाईने अवलोकन करणारे होत. ते सतत ज्ञानप्रकाशच देणारे आहेत.
दोन्ही कानांच्या ठिकाणी ज्ञानदेवांना मीमांसांची उपमा द्यावीशी वाटते कारण दोन्ही समांतर आहेत, एकमेकांना पूरक अशा त्या पूर्व नि उत्तर मीमांसा होत. मीमांसा म्हणजे ॲनॅलिसिस, पृथक्करण !
या हत्तीरूप मस्तक असलेल्या गंडस्थळातून सतत बोधरूपी अमृतवर्षाव होत राहतो ज्याचे मनसोक्त सेवन करण्यासाठी जणू भुंगेरूपी मुनिजन आटापिटा करीत असतात ! या ठिकाणी ‘मुनी’ म्हणजे जिज्ञासू, तत्वज्ञानी पुरूष हे समजून घ्यायला हवे.
इभ-मस्तक म्हणजे हत्तीच्या डोक्यावर जे दोन उंचवटे दिसतात ते ज्ञानदेवांना द्वैत आणि अद्वैत असल्याचे भावतात. मध्वाचार्यांचा द्वैतवाद आणि शंकराचार्यांचा अद्वैत सिद्धान्त हे दोन्ही शब्दब्रह्माचाच अविष्कार असल्याने त्यांचा समन्वय ज्ञानदेवांनी साधला आहे !
वेद-वेदांगांचा उहापोह करताना ज्ञानदेव उपनिषदांना कसे विसरतील ? दहाही उपनिषदें हा श्रीगणेशाचा मुगुट असल्याचे प्रतिपादन ते करतात. या दहा सुगंधी पुष्पांत ज्ञान-मकरंद साठवलेला असून तो अत्यंत उदारपणे वाटून टाकण्याचे औदार्य माऊली दाखवतात !
वास्तविक श्रीगणेशाचे वांग्मयरूप पाहायला आपले डोळे असमर्थ असले तरी ज्ञानदेवांच्या प्रज्ञाचक्षूंना ते सहज जाणवले.
माझ्या जेष्ठ भगिनी श्रीमती विजयाताई सबनीस यांनी त्यांचेकडील स्वत:चे लिखाण अगत्यपूर्वक पाठवले त्यातील मला कळलेला भाग केवळ आपल्या समोर ठेवला. खरंतर त्यांची लेखनशैली अतिशय रसाळ आणि सोपी आहे मात्र त्यांतील सिद्धान्त एवढे सोपे नाहीत ! या लेखाचे सर्व श्रेय सबनीस काकूंनाच आहे.
रहाळकर
अंगारिका चतुर्थी
मु. पो. तळेगाव दाभाडे
(परांदवाडी ) “सुकून”
६ जानेवारी २०२६