Wednesday, June 10, 2026

 

‘ख-पुष्प’ दुसरें (दासबोध’

 -पुष्पदुसरे……! 

प्रत्यक्ष दासबोध या महान ग्रंथाचा मागोवा घेण्याआधी तत्कालीन लोकस्थिती कशी होती हे जाणून घेणे सयुक्तिक ठरेल. खरंतर तो काळ अतिशय आणिबाणीचा होता. भारतीय समाज आतून बाहेरून विस्कळीत आणि दिशाहीन झाला होता. एक भिन्न संस्कृती असलेली परधर्मीय (मोगल) राजसत्ता पाय रोवून उभी होती. वास्तविक पाहतां ब्राह्मणवर्ग परंपरेने भारतीय समाजाचा बौद्धिक पुढारी होता, मात्र तोच आचारभ्रष्ट आणि विचारभ्रष्ट झाला होता. त्याग, नि:स्पृहता आणि तपश्चर्या विसरून ते अतिशय स्वार्थी बनले होते. क्षत्रिय समाज शौर्य, वीर्य, पौरूष आणि पराक्रम यांचे प्रतीक असायचा. मात्र शूर क्षत्रीय धर्मश्रद्धा विसरले  नि यवनांच्या सेवेद्वारें स्वार्थ साधण्यांत धन्यता मानूं लागले. समाजातील धनिक व्यापारी वर्ग अघिकारी व्यक्तींशी अत्यंत लाचारीने वागून स्वत:ची तुंबडी भरत होता. त्याचप्रमाणे सर्व समाजांत अनेक प्रकारची सोंगे ढोंगे, नास्तिकपणा, वाह्यात तर्कटीपण आणि बुवाबाजीला तर जणू ऊत आला होता. खरा धर्म आणि परमार्थ लोपल्यासारखा झाला होता. समाजात अनेक प्रकारच्या दुष्ट आणि विध्वंसक प्रवृत्ती प्रकट झाल्या आणि त्यांना रोखणे दुरापास्त झाले होते. तीर्थक्षेत्रें भ्रष्ट करणे, बायका-पोरांना बाटवणे, बायकांना पळवून नेणे नि त्यांना भ्रष्ट करून गुलाम बनवणे, व्यापाऱ्यांना लुटून मारून टाकणे ; चोऱ्या दरोडे, जाळपोळ, भयंकर क्रूर शिक्षा, गांवेच्या गांवे बेचिराख करणे, सामुदायिक कत्तल अशा मानवतेला लाज आणणाऱ्या घटना रोज कानांवर आदळत. शिवाय वारंवारच्या  दुष्काळांनी त्यांत भर घातली. लोक कसेतरी जगून कालक्रमणा करत होते

जनतेची अशी हीनदीन अवस्था पाहून समर्थांचे दयामय अंत:करण कळवळले, म्हणून एकान्तांत राहून आत्मचिंतन करण्याची विलक्षण आवड असलेला हा महात्मा आपली आवड बाजूला सारून लोकसंग्रहार्थ, लोककल्याणासाठी जनतेमध्ये मिसळला

श्रीसमर्थांनीराज्य-क्रांतिशिवाय समाजक्रांती नाही आणि समाजक्रांतीशिवाय धर्मक्रांती घडवून आणता येणार नाहीअशी खूणगाठ आपल्या मनाशी बांधली. सुदैवाने त्याच सुमारास महाराष्ट्रामध्ये शिवाजीराजे मोठ्या हिंमतीने आणि नि:स्वार्थपणे राज्यक्रांती घडवून आणण्याच्या धाडसी उद्योगात गुंतले होते. त्यांच्या कार्याला शंभर टक्के जनतेची साथ मिळावी म्हणून श्रीसमर्थ एक नवा ध्येयवाद घेऊन पुढे सरसावले. त्यांत त्यांचे दोन हेतू - एकतर आपल्या राज्यातील लोकांना सुखासमाधानाने, निर्भयपणे जगतां यावे यासाठी राजाने राज्य चालवावे आणि प्रजेला सुखी ठेवण्यासाठी राजा एका अर्थानेबैरागीअसायला हवा, राजाराजर्षीहवा, तो उत्तम पुरूष असावा आणि दुसरे - स्वराज्यामध्ये निर्भयपणे नि सुखाने जगण्यासाठी लोकांनी आध्यात्मिक मूल्यांची जोपासना करायला हवी ; जीवनांतील उच्च मूल्यें आणि परमार्थ साधण्याच्या दृष्टीने समाजासाठी समर्थांनी एक नवासंन्यासी संप्रदायसुरू केला. त्यांचामहंतहा प्रथम भक्त आणि नंतर समाज-नेता बनतो. त्याचेपुढारीपण’ ‘समाजकारणआणिराजकारणआध्यात्माच्या म्हणजेच धर्म आणि नीतीच्या भक्कम पायावर उभे असल्याने त्याच्या जीवनात प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा सुरेख संगम आढळतो.


आणि याच हेतुने श्रीसमर्थांनी ठिकठिकाणीं मठ-स्थापना केली. समर्थांचा मठ म्हणजे लोकसंघटनेचा केंद्रबिंदू बनला ; प्रत्येक रामदासी महंताच्या जीवनाला एकीकडे आध्यात्माचे आणि नीतीधर्माचे अंग होते, तर दुसरीकडे समाजसेवेचे आणि प्रसंग पडल्यास राजकारणाचे अंग होते. त्यांच्या हातून समाधानकारकलोकसंग्रहझाला आणि भारतीय समाज संकटमुक्त झाला ! ( लोकसंग्रह म्हणजे निव्वळ कित्येक लोकांना एकत्र आणणे नसून त्यांना आध्यात्मिक, समाजाभिमुख, सक्रिय स्वयंसेवक बनवणे होय, हे जाताजातां नमूद केलेले बरे ! समर्थांचा महंत हाआधी केले मग सांगितलेया कॅटेगरीतला बरे का ! ) असो


पुढील भागात श्रीसमर्थांच्या अमाप उदंड वांग्मय-निर्मितीचा थोडक्यात आढावा घेऊं, तोंवर क्षणभर विश्रांती

रहाळकर

१० जून २०२६ 


Saturday, June 06, 2026

 

स्मित आणि हास्य !

 स्मित आणि हास्य

आज गॅलरीत बसलो असताना सहज विचार आला की परमेश्वराने ही सर्व सृष्टी निर्माण करताना त्यांत किती किती विविधता भरून ठेवली आहे नै ! कोणतेही दोन चेहेरे कधीही सेम टु सेम नसतात आणि प्रत्येक चेहेऱ्यावरचा भाव किती वेगळा होत असतो क्षणोक्षणी. तथापि काही चेहेरे कायम त्रासलेले, काही दुर्मुखलेले, काही शांत प्रसन्न तर काही उच्छृंकल, हावरट वाटावे असे. काहींवर मंद स्मित कोरलेले तर काही कित्येक अर्थ काढता येतील असे मोनालिसा सारखे ! काही कायम रागीट भासणारे तर काही मातेप्रमाणे स्निग्ध नि सोज्वळ


मला मोटार गाड्यांचा विलक्षण छंद होता बालवयापासूनच हे अनेकवेळा सांगून झाले आहे. त्याचे मूळ कारण आत्तांच लक्षात आले आणि ते म्हणजे प्रत्येक मोटारीचा मुखवटा ! काही गाड्यांची चेहेरेपट्टी मला जास्त आवडायची, त्यातल्या त्यांत हसऱ्या-बुजऱ्या दिसणाऱ्या, जशा मॉरिस मायनर, ऑस्टिन, प्रिफेक्ट फोर्ड, व्हीएट फोर्ड, शेव्हरलेट नि वूल्सले. मात्र डॉज, प्लायमाऊथ, स्टुडबेकर आणि मर्सिडीज काहीशा रांगड्या नि रागीट भासत ! तुम्हाला सांगतो, त्या मोटारींच्या फ्रंट व्ह्यू वरून मी सहज तिचा मेक किंवा ब्रॅंड ओळखायचो. काहींची बॉनेट्स आणि फ्रंटेज विलक्षण गोंडस वाटायचे मला. हीच गोष्ट पाळीव प्राण्यांची. एखाद्या कुत्र्याचं किंवा मांजराची चेहेरेपट्टी खूप गोड वाटायची तर काहींची भ्यासुर ! मात्र एक बाब बालपणीच लक्षात आली तुम्हाला सांगतो की माणसासारखीच जनावरांची पिल्लें देखील लहानपणी खूप गोंडस दिसतात, अगदी कोंबडी किंवा गर्दभाची पण


तरीही, ज्या चेहऱ्यावर कायम स्मितहास्य झळकत असते त्यावर कुणाचाही जीव जडत असतो. एकेकाळी रघुवीर मुळगावकरांची चित्रें खूप मन-लुभावनी वाटत, मग तीं राम-कृष्णांची  असोत की मारूतीरायांची. मला वाटतं त्यांनी रावण, शूर्पणखा, घटोत्कच किंवा हिडिंबेची चित्रे म्हणूनच काढली नसावीत कारण तिथे स्मितहास्य कसे दाखवणार, तिथे केवळ बीभत्स हास्याचा गडगडाट


तुम्हाला म्हणून सांगतो, ‘एकेकाळीकाही नटनट्या खूप आवडत मलामला स्पष्ट आठवतेय एक नटी कामिनी कदम नावाची जी सिनेसृष्टीत स्मिता म्हणून काही काळ वावरली. तेव्हा रेखाचित्रा, जयश्री गडकर, उषा किरण, उषा चव्हाणपद्मा चव्हाण वगैरे सौंदऱ्यवती असल्या तरी सुलोचना रत्नमाला वगैरे बऱ्यापैकी सोज्वळ चेहेऱ्यांच्या नट्या अस्तित्वात  होत्या, तरी कामिनी कदमचे शॉर्ट पदार्पण लोभस वाटले होते खास ! इंदिरा चिटणीस खाष्ट असूनही आवडायच्या. पुरूष नटांबद्दलही किंचित बोलणे वावगे वाटू नये म्हणून केवळ ! रमेश देव, चित्तरंजन कोल्हटकर, विवेक अभ्यंकर वगैरे देखणे असले तरी दामुअण्णा, धुमाळ, सूर्यकांत-चंद्रकांत वगैरे मातब्बर आणि मधु आपटे हा तोतरा नट भाव खाऊन जायचा. असो


अखेर प्रत्येक व्यक्तीची चेहेरेपट्टी त्याच्या अंतरंगाचे प्रतिबिंब असते असे म्हटले तरी कित्येकजण जाणीवपूर्वक ते लपवून खोटे हंसू दाखवीत असतातटीव्हीवरच्या  बाबा-बुवांसारखे. अर्थात ते नाटकही फार काळ टिकत नसते हेच खरे


अखंडित प्रसन्नता अंगीं बाणवण्यासाठी खूप मशक्कत करावी लागते बरं का ! मुळात तसा पिंड असावा लागतो. प्रसन्नता कुणी कुणाला देऊ शकत नाही खिरापतीसारखी, ती स्वत:  मिळवावी लागते. तुम्हाला पुन्हा सांगतो, ते प्रयत्नसाध्य आहे


आत्तां अचानक माऊलींची ओंवी आठवली- ‘देखें अखंडित प्रसन्नता / आथी (आहे) जेथ चित्ता / रिगणे नाही (उद्भवत नाही) समस्तां / संसारदु:खां //‘ म्हटलेच आहेप्रसादस्तु प्रसन्नता’ - प्रसन्नता किंवास्मित-हास्यहाच प्रसाद होय


खूप खूप विषयांतर होत गेलंय ना, साहाजिकच आहे, वयं मोठं खोटम् ! !

रहाळकर

जून २०२६


This page is powered by Blogger. Isn't yours?