Sunday, July 05, 2026
साधी माणसं !
साधी माणसं !
आज पुन्हा एकदा ‘बचपन के उन दिनों’ की खूप याद येतेय्. त्याकाळीं घरें असत, फ्लॅट किंवा अपार्टमेंच्स् नव्हेत आणि घरांनाही घरपण असे. गल्लीतल्या संवत्सर फडणिस रहाळकरांच्या इमारतींत काही भाडेकरू राहात असले तरी त्यांचीपण घरेंच होती, फ्लॅटसारखी दिसत असूनही. बहुतेकांचे दरवाजे हमेशाच खुल्ले असत, कुणीही कुणाकडेही केव्हाही दरवाज्यावर थाप न मारतांही बिनधास्त एन्ट्री मारत असे. खरंच खूप साधीसुधी माणसं होती सगळीच.
काही मोजक्या घरात चारचाकी वाहने असली तरी घरोघरी एक किंवा अधिक सायकली मात्र नक्कीच असत. टेलीफोन (लॅंडलाइन) वाली मंडळी इक्कादुक्का. मात्र अचानक लाईन (वीज) गेली तर टेलिफोन करताच अर्ध्या तासात पॉवरहाऊसची माणसे हजर होत, अगदी धोधो पाऊस पडत असतानाही ! त्यांचे ओलेचिंब काळे रेनकोट, शिरस्त्राण नि गम् बूट आणि हातांत भली मोठी विजेरी (टॉर्च) चांगला स्मरणात आहे.
त्याकाळीं गल्लीतला रस्ता डांबरी किंवा कॉंक्रीटचा नव्हता. म्युन्शिपाल्टीचा टॅंकर रोज संध्याकाळी या मातीच्या रस्त्यावर पाण्याचा सडा टाकून जायचा उन्हाळ्यात आणि दिवसभर तापलेल्या त्या मातीला ओल्या मातीचा विलक्षनण सुगंध यायचा ! (एका कवितेचा मुखडा आठवला - ‘ओल्या मातीचा वास येताना, अनोळखी पक्षी गीत गाताना, हळव्या निजेंत बुडताना गांव, माझ्यासाठी तू एक दिवा लाव’ ! ) — डोक्यावरून गेली ना ही देखील ? असो.
आमच्या तिन्हीचारी गल्ल्यांत बहुतांश मराठी कुटुंबे राहात, मध्यमवर्गीय सर्वच. काही गर्भश्रीमंत असले तरी राहाणीमान मध्यमवर्गीयच. त्यामुळे कधीही श्रीमंतीचा माज कधीच आढळला नाही. सार्वजनिक गणेशोत्सव मात्र धूमधडाक्यात मनवला जाई दरवर्षीं आणि सर्व वयोगटातील स्त्रीपुरूष त्यांत हिरिरीने सहभाग घेत, सहकार्य करीत आणि नवनव्या पायंड्यांची मुहूर्तमेढ करीत, जी गावातील इतर मंडळें नक्कल करीत. दहाही दिवस कार्यक्रमांची रेलचेल असे. या उत्सवा दरम्यान काही जोड्या जमत तर काही तुटतही ! असो.
रविवारी किंवा सुटीच्या दिवशीं मंडई किंवा ‘मार्केट’ ची जबाबदारी बाबू लोकांवर म्हणजे पुरूष मंडळी सांभाळीत. मग सायकलवर चारदोन थैल्या लटकावून मार्केटमधे इतरही मित्रमंडळी भेटली की तिथली चाय-भजीं चापली जात ! आमरसासाठी आंबे खरेदी हा तर एक सोहळा असे.
अतिशय शांत, निवांत होते ते दिवस नि तेव्हाची माणसंही. खूप साधी सुधी, भोळी भाळी, मनस्वी आणि रसिक देखील बरं का !
प्रभु रहाळकर
५ जुलाय २०२६.
Thursday, July 02, 2026
‘ख’ पुष्प चौथें - विहंगावलोकन श्री समर्थांचा दासबोध
‘ख’ पुष्प चौथें- श्रीसमर्थांचा दासबोध एक विहंगावलोकन !
श्रीमत् दासबोधांत ईश्वरप्राप्तीचे निश्चित ‘साधन’ म्हणून भक्तिमार्ग सांगितला असला तरी तो विलक्षण बुद्धिप्रधान असून त्यांत व्यवहार आणि परमार्थ यांचा सुरेख मेळ घातला आहे. वास्तविक भक्ती हे साधन नसून तें साध्य आहे याची खातरजमा होणे ज्ञानप्राप्तीविना शक्य नाही हेच खरे. असो.
समर्थ स्वत: अध्यात्माच्या अति उच्च पातळीवर असूनही सामान्य माणसांविषयीं अत्यंत सहानुभूतीने विचार करतात हे दासबोध वाचत असताना वारंवार लक्षात येते. सामान्य माणसाला देव तर हवा असतो, मात्र प्रपंच आणि पैशाला धक्का न लावतां ! आणि म्हणून प्रपंचाची घडी विस्कटूं न देतां ईश्वरप्राप्ती कशी करून घेता येईल त्याचा मार्ग दासबोधात सांगितला आहे.
तत्कालीन भारतीय समाज व्यावहारिक आणि पारमार्थिक क्षेत्रातही मागे का पडला याची चिकित्सा विचारवंतांनी केली आहे, मात्र श्रीसमर्थ त्यांची दोन कारणे सांगत असत. एकतर नीट विचार न करणे आणि प्रयत्नांत कुचराई. थोडक्यात अविवेक आणि आलस्य ! खरंतर ही दोन कारणे भाग्यहीनपणाची, अवनीतीची आणि दैन्यावस्थेची लक्षणे होत. दुसरीकडे विवेक आणि उदंड कष्ट ही सुदैवाची, भाग्यवंताची, उन्नती नि उत्कर्षाची लक्षणे असल्याचे ते आग्रहाने प्रतिपादन करीत.
या लांबलचक प्रस्तावनेनंतर विहंगावलोकन करत असतांना श्रीसमर्थांनी दासबोध हा ग्रंथ कशा प्रकारें रचला असेल ते थोडक्यात नजरेखालून घालूंया. पहिले दशक ‘स्तवनाचे’ आहे. श्रीगणेश, सरस्वती शारदा, सद्गुरू आणि संत यांना वंदन करत त्यांना आवाहन करतात. लगोलग कवी, श्रोते, सभा, परमार्थ आणि नरदेह यांचा मानवी जीवनांत परस्पर संबंध आणि आध्यात्म साधनेचे महत्व सांगून त्यांचेही स्तवन करतात.
तथापि ग्रंथारंभींच आपल्या ग्रंथाचे नाव, ग्रंथ लिहिण्याचा हेतू, ग्रंथात विवेचन केलेले विषय, ग्रंथाच्या अभ्यासाचे फलित तसेच ग्रंथातील प्रमेयांचे आधार किंवा संदर्भ प्रांजळपणे सांगतात.
या ग्रंथाचे नाव आहे ‘दासबोध’ जो गुरूशिष्य संवाद स्वरूपात मांडला आहे. यांत मूलत: भक्तिमार्गाचे सुस्पष्ट विवेचन असले तरी यांत गहन आध्यात्मिक नि पारमार्थिक मूल्यांचा आणि आत्मज्ञान विषयक विचारांचा विस्तृतपणे उहापोह केल्याचे सहज लक्षात येईल. सावकाश, काळजीपूर्वक हा ग्रंथ अभ्यासला तर कुणीही सामान्य माणूस असान्यत्वाकडे सहज वाटचाल करू शकेल !
ननविधा भक्ती, ब्रह्मज्ञान नि वैराग्य यांवर विशेष भर असला तरी ‘आत्मविद्येच्या’ अनेक अंगांचे विवेचन त्यात जागोजागी आढळून येईल. भक्तिमार्गाने चालणाऱ्या माणसाला ईश्वरदर्शन हमखास घडेलच अशी त्यांची गॅरंटी आहे !
शिवाय या ग्रंथांत अनेक चुकीच्या किंवा भ्रांत विकल्पांचे निराकरण आहे. दासबोध लिहितांना घेतलेल्या अनेक ग्रंथांचे नाव घेण्यात त्यांना अजिबात संकोच वाटत नाही. यांत उपनिषदें, वेद आणि ब्रह्मसूत्रें महत्वाचे आधार असले तरी शास्त्रप्रचीती बरोबरच प्रामुख्याने आत्मप्रचीती म्हणजेच स्वानुभवाचाच आधार घेतल्याचे ते नि:संधिग्धपणे सांगतात. याच समासांत ते आधारग्रंथांची नामावली सादर करतात. ‘शिवगीता, रामगीता, गुरूगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदान्तभाष्य, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदें, भागवत इत्यादि इत्यादि ! ( खरं सांगू, यातील कित्येक कुणी कधी ऐकलीही नसतील ! )
तथापि अत्यंत कळवळ्याने ते सुचवतात की आपल्याला सोसेल, झेपेल तेव्हडेच प्रत्येकाने दासबोधातून घ्यावे हे सगळ्यात उत्तम ! - “आतां असो हे बोलणें / अधिकारासारखे घेणे / परन्तु अभिमान त्यागणे / हें उत्तमोत्तम ! //“
सरतेशेवटीं दासबोधाच्या अभ्यासाने मिळणारे फळ सांगतात - “ आतां श्रवण केलियाचे फळ / क्रिया पालटे तात्काळ / तुटे संशयाचे मूळ / येकसरां // मार्ग सापडे सुगम / न लागे साघन दुर्गम / सायोज्य मुक्तीचे वर्म / ठांईं पडे // नासे अज्ञान दु:ख भ्रांती / शीघ्रचि येथे ज्ञानप्राप्ती / ऐसी आहे फळश्रुती / इये ग्रंथीं //
“ योगियांचे परमभाग्य / आंगीं बाणें ते वैराग्य / चातुर्य कळे यथायोग्य / विवेकें सहित // भ्रांत अवगुणी अवलक्षण / तेचि होती सुलक्षण / धूर्त तार्किक विचक्षण / समयो जाणती //
आळसी तेच साक्षपी (उद्योगी) होती / पाली तेचि प्रस्ताविती (पश्चात्तापी) / निंदक तेचि वंदूं लागती / भक्तिमार्गासी //
“बद्धचि होती मुमुक्षु / मूर्ख होती अतिदक्ष / अभक्तचि पावती मोक्ष / भक्तिमार्गें // नाना दोष ते नासती / पतित तेचि पावन होती / प्राणी पावे उत्तम गती / श्रवणमात्रें //“
मंडळी, हे प्रदीर्घ ‘विहंगावलोकन’ वाचल्यावर जर कुणाला पुन्हा एकदा हा महान ग्रंथ हातीं घ्यावासा वाटला तर या खटाटोपाचे सार्थक झाल्याचे समाधान वाटेल.
पुन्हा कधीतरी अशीच उंच भरारी घेत खोल महासागरात झपाट्याने सूर मारून काही मौक्किकें मिळवता आली तर प्रयत्न करूयात ?
तूर्तास विराम देतो, पूर्णविराम नव्हे स्वल्पविराम ! !
जय जय रघुवीर समर्थ - जय जय श्रीराम.
रहाळकर
२ जून २०२६