Sunday, March 30, 2025
विक्रम नि त्रिविक्रम !
विक्रम नि त्रिविक्रम !
यंदाचे नूतन संवत्सर ‘विक्रम’ या नावाने संबोधले जाईल असे ऐकले होते पण त्यात तथ्य नाही. वास्तविक विक्रम संवत् हे मध्यप्रदेशातील मालव प्रांत किंवा माळव्यांतील अतिप्राचीन उज्जयिनी अथवा उज्जैनचा शासक चंद्रगुप्त विक्रमादित्य यांचे नावाने प्रसिद्ध आणि प्रचलित आहे. खरेंतर इतिहास नि गणित हे दोन्ही विषय मुळातच अधू राहिल्याने पुढे त्या अनुषंगाने येणारी अनेक कवाडें बंद झाली ती कायमची. त्यांत पंचांग, ग्रहांचे परिभ्रमण, आणि त्यातून उद्भवणारे फल-ज्योतिष्य वगैरे महारथी कोसों दूर राहिले आणि त्यांत भर पडत गेली इंग्रजी नि भारतीय क्यालेंडरे आणि पंचांगांची. अजूनही दोन्ही अनाकलनीय वाटत राहिल्या आहेत मला. असो.
मात्र मागील वर्षांचे क्रोधी नाम संवत्सर बऱ्यापैकी त्या नावाची चुणूक अधूनमधून देत राहिले आणि ग्रहांची फारशी तमा न बाळगणाऱ्या मला थोडे बहुत चटके देखील सहन करावे लागले. कदाचित तसल्या अनुभवांवरून आता ‘विक्रम नाम’ काहीसा हुरूप देईल असा विश्वास वाटू लागला आहे !
‘अरे भाई आखिर कहना क्या चाहते हो?’ असा सवाल येण्याआधी रूळावर येण्याचा प्रयत्न करतो.
विक्रम हा शब्द आठवताच अगदी पहिले नाव समोर आले ते राजा विक्रमादित्य यांचेच. लहानपणी त्या राजाच्या कित्येक सुरस कथा ऐकल्या आणि वाचल्यादेखील होत्या. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राणा प्रताप, बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल, राजा विक्रमादित्य (आणि राजा रविवर्मा देखील) वगैरे मंडळी खूप प्रिय झाली होती. अनेक वर्षांनंतर विक्रम-वेताळ वगैरे कॉमिक्स हाती पडली असली तरी विक्रमादित्यांचे रोमहर्षक किस्से त्या बालवयांत खूप आवडत, कदाचित प्रेरक ठरत.
त्यात शाळेतला बालमित्र विक्रम पाटणकर त्याच्या विलक्षण बुद्धिचातुर्याने, अत्यंत खिलाडू वृत्तीमुळे आणि धाडसी उपद्व्यापांमुळे आम्हा सर्वच वर्गमित्रांचा अतिशय लाडका होता. नंतर नंतर विक्रम साराभाई, विक्रमवीर सुनील गावसकर, विक्रम गोखले वगैरेंचा मी चाहता झालो.
शिवपुरीला असतांना चितळे मास्तरांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे नाव ‘त्रिविक्रम’ असे ठेवलेले स्पष्ट आठवते. वास्तविक भगवान विष्णूंचे नाव आहे हे आणि वामन अवतारांत निव्वळ तीन पावलांत तिन्ही लोक सहज पादाक्रांत करणाऱ्या वामन-अवताराचे ‘त्रिविक्रम’ नाम आहे.
खरंच सांगतो, विक्रम-त्रिविक्रम हे शब्द उच्चारतांच वरचे सगळे चऱ्हाट मांडून मोकळे व्हावेसे वाटले आणि म्हणून तुम्हास वेठीस धरले गेले. क्षमस्व ! !
मऱ्हाटी नूतन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
रहाळकर
३० मार्च २०२५
वर्ष प्रतिपदा
Tuesday, March 25, 2025
शब्द-सामर्थ्य !
शब्द-सामर्थ्य !
आज अचानक ‘अणोरणीयं महतो महीयान्’ ही उक्ती आठवली आणि शब्द-सामर्थ्याचे नवल वाटून गेले. शब्द वापरताना ते चढत्या आणि उतरत्या दोन्ही भांजणीत कसे वापरले जातात ते पाहू.
‘आकाश-अवकाश’, ‘सागर-महासागर’), विभूती योग नि विश्वरूप दर्शन योग, व्याज नि चक्रवाढ व्याज, (अंडे नि ब्रह्मांड) वगैरे चढत्या भांजणींत मांडले गेलेत तर लहानांतले लहान असे मॉलिक्यूल-ॲटम, इलेक्ट्रॉन-प्रोटॉन वगैरे सूक्ष्मातिशूक्ष्म देखील !
या सर्वांचे स्मरण होण्याचे आणखी एक कारण श्रीविष्णुसहस्त्रनामांतले कित्येक शब्द अर्थासकट पाहू गेल्यास नक्कीच ध्यानांत येतील. त्या निर्गुण निराकार परमेश्वराचे सगुण साकार स्वरूपांत शब्दांद्वारेच तर वर्णन करता येते ना ? माणिकताई म्हणाल्या तसे द्वैत नि अद्वैत हे देखील शब्दांतूनच मांडता येते ना. एऱ्हवीं निव्वळ अनुभवाचा प्रांत असलेले सिद्घान्त समजून घेण्यासाठी सुद्धा शब्दच महत्वाचे नाहीत काय ? अगदी आपली वाणी, जी सुप्तावस्थेत परा-अपरा असलेली पश्यंति मध्यमा वैखरी या स्वरूपात मुखरित होते की शब्द स्वरूपात !
बाप रे ! लई लई भारी होत चाललंय् हे सगळं, सबब शब्दविराम देणेच उचित होय !
रहाळकर
२५ मार्च २०२५.
एक की शून्य ?
एक की शून्य ?
आज उषाशी सहज बोलताना ‘एक’ अधिक महत्वाचा की ‘शून्य’ यावर मजेशीर चर्चा झाली. आधी वाटलं की ई.स. ६२८ मध्ये ब्रह्मभट्ट या भारतीय गणितज्ञाने शोधलेले ‘शून्य’, जे अखिल विश्वाने एकमुखाने मान्य केले, तेच सर्वोपरी महत्वाचे असावे. मात्र ही ऐतिहासिक बातमी मला ‘गूगल् बाबा’ कडून मिळाली होती आणि त्या बाबाचा मी अंधश्रद्ध नक्कीच नाही. कारण मला स्वत:चे जे मत असते तिथे गूगलच काय कोणताच बाबा हस्तक्षेप करू शकत नाही !
खरेतर शून्यातूनच महा-शून्याची संकल्पना रूढ झाली असावी, जी आपली अनादी वेद-शास्त्रें-पुराणें सांगत आली आहेत असे म्हटले जाते.
वास्तविक शून्याची महती सांगायला माझी वाणी असमर्थ आहे याची मला जाण असली तरी महा-मूर्खांचे ते अद्वितीय लक्षण असते असे मानून तुम्ही सूज्ञांनी तिकडे काणाडोळा करावा ही नम्र विनंती. नमनालाच सर्व तेल वापरून ते वांया घालू नये असे कुणास ठाऊक का मला आत्ताच जाणवले. सबब मूळ मुद्यावर येतो.
असे पहा, एक शून्य जर एक या संख्येआधी लावले तर एकाची किंमत एक राहते, पण तेच जेव्हा एकाच्या पुढे लावले तर त्याच एकाची किंमत दहा होते आणि ती प्रत्येक शून्याबरोबर ‘एकम्, दशम्, शतम्, सहस्त्रम् अशी वृद्धिंगत होत जाते. हे सगळे आपण पहिली दुसरीत शिकले आहोंत. म्हणजेच ‘एक’ची किंमत कमी जास्त करायला शून्याचे महत्व जास्त नाही काय ?
ते असो.
‘एक अधिक महत्वाचा की शून्य’ हे ठरवताना ‘पहिले मुर्गी या पहिले अंडा’ या प्रश्नाचे उत्तर शोधणे आवश्यक आहे. अर्थात या आधीच मी ‘पहिले अंडा’ हे सप्रमाण सिद्ध करून दाखविले आहेच. त्या वेळी अंड्याला ब्रह्मांड या अतिउच्च पातळीवर नेऊन ठेवले होते आणि ब्रह्मांड हेच सर्व उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे मूळ स्थान असल्याने त्यांत ‘मुर्गी’ देखील आलीच की !
अगदी तसेच शून्य हे एकापेक्षा अधिक महत्वाचे असे सिद्ध करता येईल. त्या ‘एका’ला अनेक होण्याची ‘इच्छा’ झाली म्हणूनच हे जग ‘निर्माण’ झाले असे म्हटले तर ‘शून्या’तून ‘महाशून्या’कडे वाटचाल करणे क्रमप्राप्त का ठरूं नये ? तसेही अमक्याने अगदी शून्यातून हे वैभव निर्माण केले असा आपल्याकडे वाक्प्रचार आहेच ना ?
तर मग त्या शून्याला ‘अ-क्षर’ पुरूष म्हणता येईल का, अव्यक्त स्वरूपात असूनही विश्वनिर्मितीची क्षमता असलेला !
खरंच मजेशीर आहे ना हे सर्व चर्वीचरण करायला ?
जस्ट प्लेटफुल्स ऑफ फूड फॉर थॉट ! ! !
रहाळकर
२५ मार्च २०२५