Saturday, November 15, 2025
यति-पूजन !
यति-पूजन !
“मनीं धरावें तें होते / विघ्न आघवें चि नासोनि जाते /
कृपा केलिया रघुनाथें / प्रचीत येते //
“पुण्य करावे करवावें / ज्ञान धरावे धरवावे /
स्वयें तरावें तरवावे / एकमेकां //“
जय जय रघुवीर समर्थ !
माझे तीर्थरूपांना देव-ब्राह्मण-साधक-सिद्ध-संन्यासी-यती यांचे पूजन करण्याचा विलक्षण छंद होता. वडीलधाऱ्या आणि थोर व्यक्तींशी वागत-बोलत असताना अतिशय विनम्रपणा बाळगण्याचा त्यांचा अट्टाहास असे.
प्रत्यक्षातही यती संन्यासी ब्राह्मणांचे चरण-प्रक्षालन करून पूजा करण्यात त्यांना धन्यता वाटे. मात्र आमच्या बालिशपणामुळे त्यांच्या तशा कृती त्यावेळी आम्हाला कृत्रिमपणाच्या वाटत, आवडतही नसत !
तथापि, आता ते प्रसंग आठवताना त्यांतील मर्म थोडेथोडे ध्यानीं येऊ लागले आहे. खरोखर एखाद्या व्यक्तीला आपण थोर, आदरणीय, पूजनीय कशामुळे ओळखतो ? एखाद्या व्यक्तीची भक्तिभावें पूजा करावी असे मनोमन केव्हा वाटू लागते ?
मला वाटतं याचे दोन प्रकारे विश्लेषण करता येईल. एक- आपल्यातले ‘खुजेपण’ जेव्हा आपल्याला प्रकर्षाने जाणवूं लागते, हिणवूं लागते कदाचित तेव्हा आणि दोन- इतरांचे सद्गुण त्यांच्या विचार, आचार, बोलण्यातून नि प्रत्यक्ष कृतींतून आपल्याला दिपवतात, दिंग्मूढ करतात तेव्हा ! म्हटलेच आहे ना, ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती’ !
या दोहोंतला पहिला भाग तात्पुरता बाजूला ठेवू कारण त्यामुळे निष्कारण आत्मश्लाघा, आत्मप्रताडना आणि ……न्यूनगंड दिग्दर्शित केल्यासारखे होईल.
मात्र थोर व्यक्तींच्या थोरपणाचा मागोवा घेण्यासाठी ‘दासबोध’ हा महान ग्रंथ सर्वप्रथम आठवला. नंतर आणखी एक लहानसे पुस्तक, रॉबिन शर्मा लिखित ‘दि मॉंक हू सोल्ड हिज फेरारी’ देखील ! त्या काल्पनिक कादंबरींत हिमालयांत वास्तव्य करणाऱ्या ‘यति-सदृश’ महामानवांच्या समुदायाचे वर्णन आहे त्यांच्या एकंदर जीवनशैलीं बद्दल. ते कथानक कपोल-कल्पित (fiction) असले तरी ते अगदी वेगळ्या नि मोहक भाव-विश्वांत रमविणारे आहे हे नि:संशय. एका अतिशय तरल, अतिसूक्ष्म अनुभूतिचा साक्षात्कार घडविणारं ते वर्णन आहे खरे.
श्रीमद् दासबोधांत श्रीसमर्थांनी तीन प्रकारच्या व्यक्तिमत्वांचं अप्रतिम वर्णन केलेले लक्षात येईल - सद्गुरू, संत आणि श्रोता. अर्थात ‘कवीश्वर’ आणि सभा-स्तवन यांतही प्रामुख्याने व्यक्तिमत्वावरच भर आहे.
आपल्याला एखादी व्यक्ती पूजनीय वाटते कारण त्यांचेतील अलौकिक व्यक्तिमत्वामुळे आपण भारावून जातो. एखाद्या संन्याश्याच्या बाह्य स्वरूपाचा आदर वाटून प्रणाम केला तरी त्यांचे पूजन घडेलच असे नाही. या उलट एखादे अलौकिक व्यक्तिमत्व पाहून मनावर खोल ठसा उमटतो आणि मनोमन का असेना आपण शरणागत होतो आणि माझ्या मतें असे घडणे हीच मुळात खरी पूजा असू शकेल. असो.
मला आत्तां आठवतात आम्ही सद्गुरू-चरणांची भक्तिभावें केलेल्या पाद्य-पूजा. अतिशय निर्विकारपणे तो सोहळा ते पाहात मात्र कधीही त्यातील उणीवा दाखवीत नसत. अगदी पहिल्यांदा जेव्हा इतर कोणीतरी अत्यंत प्रेमाने त्यांची षोडषोपचारे चरण-सेवा करताना पाहिले तेव्हा त्या सेवकाच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कृतकृत्यता मनात घर करून गेली होती आणि आपल्याला कधी तितक्याच उत्कटतेने तशी संधी कधी मिळेल का याची तळमळ लागली खरी. नंतर केव्हातरी भाग्य उजळले आणि मनातली सुप्त इच्छा पूर्ण झाली. नंतर मात्र जेव्हा कधी अशी सेवा करताना पाहायचो तेव्हा सद्गुरूंचे भाव टिपण्यात रंगून जात असे मी. मघां ‘निर्विकारपणे’ हा शब्द वापरला मी, त्याचे कारण त्यावेळी ते आपल्या स्वत:च्या सद्गुरू-स्मरणात गढलेले जाणवायचे !
आमच्या राहत्या घरीं श्रीमत् शंकराचार्यांची अण्णांनी केलेली पाद्य-पूजा, गणपती-ब्राह्मण-भोजनाचे निमित्त आई-अण्णांनी केलेल्या एकवीस ब्राह्मणांचे चरण-प्रक्षालन अजूनही डोळ्यांसमोर स्पष्ट दिसते. आईने दूध-पाण्याने प्रत्येकाचे धुतलेले पाय अण्णा स्वच्छ नॅपकिनने पुसून त्यांवर गंधाक्षता नि फुलांचा जणू अभिषेक करीत. ओह, तो भक्किभाव खोलवर कुठेतरी दडून आहे अजून !
रहाळकर
१५ नोव्हेंबर २०२५.
Tuesday, November 11, 2025
अध्यात्म आणि दैनंदिन व्यवहार !
अध्यात्म आणि दैनंदिन व्यवहार !
मंडळी, आज जरासे तिखट तुरट खारट आंबट वाढायचं ठरिवलंय् म्यां. हे बुफे डिनर नाही तर चक्क पंक्तीला बसविणार आहे तुमास्नी माझ्या संगट. मी खाल्लेच नाही तर काय करशील असे म्हणालात तरी माझा आग्रेव करायचा छंद बी हाय नि अधिकार बी, कारन एकुलते एक - निव्वळ वरूषांनी भौतेक मीच तर वरिष्ठ हाय ना ! ( ऑलमोस्ट ! ! )
विषय म्हनला तर कठीण हाय नि म्हनला तर सोहपा बी. अहो ‘अध्यात्म बिध्यात्म’ रोज-रोजच्या आयुषातून काही वेगळं असतं काय ते आधी मला सांगा. उगाच आध्यात्म्याला डोईवर बसवायचं आनि वागताना फकस्त व्योवहारिक हे काही बरोबर नाय् पहा. अहो बाप्पा, तुकाराम म्हाराज आनि तुकडोजी म्हाराज, इतकंच न्हाय तर सगलेच म्हाराज काई बी वेगलं सांगत हुते काय हो ? आध्यात्म काय आनि व्योवहार काय हे दोनी एकाच शिक्क्याच्या बाजू हायेत असेच संत लोक सांगत राहिले.
मात्र आपण आता त्याच विचारांचे नकळत विडंबन करत चालले आहोत हे लक्षात येतंय का आपल्या. शेवटी अध्यात्म अध्यात्म तरी नक्की काय ? सततचे नामस्मरण, पूजा-अर्चा, पोथी पारायणें, पाद्य-पूजन, उत्सव, जयंत्या मयंत्या एवढेच ? या सर्व खटाटोपातून थोडेबहुत समाधान मिळत असले तरी ते कायम, चोवीस तास टिकून राहते काय? जरासे खुट्ट काही झाले की आपला पारा चढतो, मनस्ताप होतो, मनाचे स्वास्थ्य डावाडोल होते. आध्यात्मिक कार्यकलापांतून अपेक्षित असते इक्विपॉईज, मनाचा समतोल, सर्वत्र समभाव, शाश्वत सुख नि आनंद ! हे सर्व कायमस्वरूपी मिळवण्यासाठी आध्यात्मिक साधना उपयोगी पडायला हवी. देवा-धर्मावर अजिबात विश्वास नसलेला माणूसही सश्रद्धच असतो, काहीही बाह्योपचार न करणारा.
मला असं वाटतं की सर्व प्रकारच्या साधना करत असताना स्वत:चे सेल्फ-ऑडिट करणे खूप महत्वाचे आहे. आपण शनैशनै: उन्नत होत राहिले पाहिजे, स्वत:चा पुढचा टप्पा सर करता आला पाहिजे, होय याचि देहीं याचि डोळां ! पुढच्या जन्माची वाट न पाहातां माझे आत्तांचे लक्ष्य मलाच ठरवले पाहिजे. मला खूप खूप अकॉमोडेटिव्ह असलं पाहिजे अर्थात समोरचा काय बोलतोय्, कसा वागतोय् इकडे अधिक समंजसपणे पाहायला शिकले पाहिजे. त्यांच्या विचाराशीं, कृतींशी असहमत असूनही ते स्वीकारण्याचे बळ आपल्या जवळ हवेच. माझी बहीण बरेच वेळा म्हणून जाते, ‘ऑल राईट, वुई ॲग्री टु डिसॲग्री’ ! अशी ॲटिट्यूड असायला हरकत नाही. आध्यात्माचे असेही फलित असू शकेल.
कघी कधी आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी आपण सोडून देतो खऱ्या, पण वेळ येतांच त्यांवर उलटसुलट भाष्य करणे टाळता आले तरच आघीच्या ‘सोडून देण्या’ला अर्थ, नाही का ?
वागणे, बोलणे, लिहिणे नि गळीं उतरवण्याचे प्रयत्न करूं तेवढे कमी ठरतात, मात्र निदान यांवर थोडे चिंतन केले तर पहा आपल्याला आपण लवकर शोधूं शकतो कदाचित् !
रहाळकर
११ नोव्हेंबर २०२५.