Monday, October 14, 2024
आठवणीतले गणेशोत्सव !
आठवणीतले गणेशोत्सव !
एकेकाळी इंदूरमघील गणेशोत्सव म्हणजे सांस्कृतिक, मनोरंजक आणि प्रबोधक अशी त्रिवेणी साधणारे महोत्सव असत. आमचा सिख मोहल्ला, नजीकचा लोधी मोहल्ला नि काछी मोहल्ला मिळून अदमासें अडीच-तीनशे मध्यमवर्गीय कुटुंबे तिथे वास्तव्य करून होतीं, उच्च आणि कनिष्ठ यांसह. तथापि श्रीमंतीचा माज किंवा निर्धनांची लाचारी कधीच कुणी दाखवीत नसे. तोडीस तोड असे रामबाग-नारायण बागेचे गणेशोत्सव असत. तसे पाहिले तर महू आणि उज्जैनचे गणेशोत्सव देखील पूर्ण दहा दिवस छानपैकी साजरे होत.
तथापि सिखमोहल्ला सार्वजनिक गनेशोत्सव म्हणजे इंदौरच्या सांस्कृतिक वारशाचे जणू प्रतिबिंब असे, एक दिमाखदार सोहोळा- संपूर्ण दहा दिवस चालणारा. विशेष म्हणजे सर्व वयोगटातील आणि महिलांचाही भरपूर सहभाग असलेले कार्यक्रम खरोखर वैशिष्ठ्यपूर्ण होत असत.
त्या जमान्यात सिखमोहल्ला नि लोधीमोहल्ला मिळून ऐंशी पंच्यांशी टक्के मराठी भाषिक असले तरी काही गुजराती, पंजाबी, सिंधी नि मारवाडी कुटुंबेंही बोटांवर मोजता येतील इतपत होती आणि तीही या आनंदसोहोळ्यांत सहभाग घेत.
गणेशोत्सवाचे दहाही दिवस विविध उपक्रमांनी गच्च भरलेले असत. लहानग्यांसाठी निरनिराळ्या स्पर्धा, खेळ आणि विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम तर असतच, पण एखादा धनिक माणूस त्या मुलांना भरपूर उत्तेजनात्मक बक्षिसांची लयलूट करून टाकत असे.
महिलांसाठी कित्येक स्पर्धा दुपारनंतर असत तर किमान दोन तरी नाटकें हौशी मंडळी सादर करीत दर वर्षी नि त्यांची ‘प्रॅक्टिस’ दोन अडीच महिने आधीच सुरू होई. विशेष करून आठवतेय ते फक्त महिलांनी मिळून सादर केलेले तीन अंकी प्रहसन आणि त्यांत भरगच्च मिशा असलेल्या आणि पागोटें परिधान केलेल्या पाटीलाची भूमिका वठवणाऱ्या वर्तक काकू ! त्यांनी तर स्टेजवर चक्क चिलीम ओढलेली स्पष्ट आठवतेय मला ! प्रत्येक अंक सुरू होण्याआधी गजकुंडीचा धमाका कानठळ्या बसवित असे !
मुलामुलींसाठीही चित्रकला स्पर्धा, सुंदर अक्षर स्पर्धा, चमचा-लिंबू रेस नि तीन पायांच्या धाव-स्पर्धा खूप धमाल उडवीत.
तरूण नि वयस्कांसाठी वादविवाद नि सिम्पोझियम, भावगीत नि सिनेसंगीत स्पर्धा वगैरे तर हमखास ठरलेल्याच. कधी कधी प्रथितयश मंजळींची व्याख्याने सादर होत. ‘फिश-पॉंड’ हा अभिनव आणि मजेशीर कार्यक्रम कित्येकांची ‘गुपितें’ उघड करण्यात यशस्वी ठरत असे !
आत्तां विशेषकरून आठवत आहेत ते सिम्पोझियमचे काही विषय. एका वर्षी ‘ईश्वर आहे की नाही’, ‘संभवामि युगे युगे’, ‘भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये’, ‘मध्य-भारतातील मराठीचे स्थान नि भवितव्य’ असे एकाहून एक सरस विषय दर वर्षीं आघीपासून जाहीर होत आणि त्यांत इंदूर शहरातील नि बाहेरच्याही दिग्गजांना पाचारण केले जात असे.
मला आत्ता आठवत आहेत आमचे दादा (थोरल्या बहिणीचे यजमान), जे आधी ‘ईश्वर आहे’ ही बाजू मांडणार होते पण ‘ईश्वर नाही’ ही बाजू मांडणारा एक वक्ता वेळेवर येऊ न शकल्याने दादांनी अगदी वेळेवर चक्क दुसरी बाजू लढवली नि फड जिंकला होता !
म्हटलं ना, सार्वजनिक गणेश उत्सव म्हणजे कित्येकांची हृदयें हरवणारा तर काहींची ‘जुळवणारा’ देखील ठरत असे ! साहाजिकच प्रत्येक थरातल्या मंडळींना दर वर्षी तो कधी येतो अशी तळमळ असे ! !
रहाळकर
१४ अक्टूबर २०२४.
Sunday, October 13, 2024
असतोsमा सद्गमय…..!
‘असतोsमा सद्गमय
तमसोsमा ज्योतिर्गमय
मृत्योर्माs अमृतं गमय’
बृहदारण्यक उपनिषदातील हा पवनाम मंत्र हजारों वर्षांपासून भारत खंडांत उच्चारला जातोय आणि त्याने देशोदेशीच्या लाखों करोडो भाविकांची हृदये हेलावून सोडली आहेत. याचे मूळ कारण म्हणजे मानवी जीवन वेळोवेळी निराश, अश्रद्ध नि दु:खाच्या खाईंत गुदमरत राहिले आहे.
मात्र तेव्हाही वेगवेगळ्या स्थळीं नि कालखंडांत संत-सत्पुरूष, महात्मे, ऋषि-मुनी, आणि कवी यांनी अवतार घेतले आणि मानव जातीला ‘सत् चित् आनंद’ यांची ओळख करून दिली. ‘सत्त्या’ची वाट दाखवणारे हे वाटाडे दीपस्तंभा प्रमाणे यात्रेकरूंना मार्ग दाखवीत राहिले. ज्ञान-प्रकाशाने अमृतत्वाची जाणीव करून देत आले. या सत्यबोधकांनी स्वत:पासून दूर जात असलेल्या मानव जातीला त्याच्या उगमाकडे, मूळ स्त्रोताकडे पुन्हा परत येण्यासाठी नि त्याची यथार्थ ओळख करून देण्यासाठी मार्ग दाखवला.
वास्तविक समस्त मानवजात आज एका विचित्र वळणावर उभी आहे याची कुणकुणही अनेकांना नाही. महाकाय यंत्र तंत्र निर्मिती, शस्त्रात्रें नि दारूगोळा, इतकेच नव्हे तर ‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ सारख्या नवनवीन हत्त्यारांमुळे माणसाचा अहंकार इतका शिगेला पोहोचलाय की त्या अहंकाराच्या भयानक विषापोटीं समस्त प्राणिजातही एका भयंकर वादळाच्या वावटळींत सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्राराष्ट्रांतील वैमनस्यामुळे एकमेकांवर सतत गुरगुरणे आणि कुरापती काढून विश्वाला वेठीस धरून अशांतता माजविणे हा कुटिल उद्योग सुरू आहे.
हे सर्व समजून उमजून घेत समाजातील प्रत्येक हितैषीने यांवर प्रभावी मात्रा शोधून काढणे आज काळाची गरज बनली आहे. प्रबोधनाद्वारें, वैयक्तिक आचरणातून आणि संघशक्तीने या कुटिल कारस्थानांचा वेळीच नाश करणे फार अगत्याचे झाले आहे असे मनापासून वाटूं लागले आहे मला ! ! (मूळ विषय जरा बाजूला पडला त्याबद्दल क्षमस्व. )
रहाळकर
१३ अक्टूबर २०२४.