Wednesday, September 18, 2024
स्वाध्याय-यज्ञ !
स्वाध्याय यज्ञ !
विषयाचे नाव पाहून चमकलात ना, पण आज जरा एका गहन विषयावर चर्चा करूया काय ? भगवंताने कर्ममार्गाचे अधिक सखोल विवरण करताना चौथ्या अध्यायांत विविध यज्ञांविषयी उल्लेख केला. त्यांत द्रव्य-यज्ञ, तपो-यज्ञ, योग-यज्ञ, तसेच स्वाध्याय-यज्ञ आणि ज्ञान-यज्ञाचाही आवर्जून उल्लेख येतो. अर्थात् ‘वाग्यज्ञ’ हा सुध्दा महत्वाचा आहेच, जिथे शब्दानेच शब्दाचे हवन म्हणजेच वेदमंत्राचे उच्चारण होते. आणि ज्ञान-यज्ञाने होणाऱ्या यज्ञाने ब्रह्म म्हणजे नक्की काय ते उलगडते.
वास्तविक यांतील सर्वच यज्ञांचे अनुष्ठान अतिशय कठीण नि दुर्घट असले तरी ‘जितेन्ग्रिय’ असतील तेच अशा यज्ञांचे अधिकारी ठरतात असे माऊली सांगतात.
तर मग आपल्यासारख्या सामान्य जीवांनी काय करायचे हा प्रश्न शिल्लक राहतोच की. मुळात या सर्व यज्ञांचे प्रयोजनच काय असा आळशी प्रश्नही कुणाला पडला तर तो वाउगा म्हणता येत नाही. तरीही ‘मी’ कोण, ‘ईश्वर’ म्हणजे काय नि या जगाचा पसारा तरी काय म्हणून, असे विचार कधी ना कधी प्रत्येकाच्या मनात येत असणारच.
अगदी थोडक्यात नि स्पष्ट सांगायचे तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. अर्थात मी कोण, परमेश्वर म्हणजे तरी नक्की कोण आणि हे जगडंबर कशासाठी याची उकल करणारे ज्ञान तेच आत्मज्ञान होय. इतर सर्व प्रकारचे प्रापंचिक ज्ञान याला विज्ञान अशी संज्ञा आहे. अर्थात हे सर्व तुम्हाला आधीच माहीत आहे हे मलाही माहीत आहे. तथापि विषयाच्या ओघात बोलून गेलो इतकेच. असो.
तर मग ते ‘आत्मज्ञान’ होण्यासाठी काय करायला हवे ते भगवंत पुन्हा पुन्हा अतिशय कनवाळूपणे सुचवतात.
मात्र त्या आधी द्रव्य-यज्ञ वगैरे ज्ञान-यज्ञापुढे किती गौण आहेत याची जाणीव करून देतात. माऊली उदाहरण देतात सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे तेज सहज लोप पावते तसे इतर सर्व यज्ञ दुय्यम ठरतात.
आत्मज्ञान होण्यासाठी म्हणजेच ‘त्या’ अनाकलनीय ‘तत्वाचा’ शोध घेण्यासाठी एका सुंदर श्लोकातून ते उघड करतात - ‘तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया’ वगैरे. ज्याला ‘ते ज्ञान’ मिळवण्याची उत्कंठा असेल त्यांनी काय करावे यावर मार्गदर्शन आहे त्यांत. अर्थात हेही तुम्हाला आधीच माहीत आहे म्हणा.
प्रारंभी आपण ‘स्वाध्याय-यज्ञ’ असा नामनिर्देश केला होता. आणि आतांपर्यंत आपण जो केला तोच ‘स्वाध्याय-यज्ञ’ नाही का ! ! !
रहाळकर
१८ सप्टेंबर २०२४
Monday, September 16, 2024
अली ब्रदर्स !
अली ब्रदर्स !
माझे दोन चांगले वर्गमित्र होते नौशाद आणि इरशाद या नावाचे. दोघेही इंदोरच्या एका प्रख्यात डॉक्टरांचे सुपुत्र. खानदानी मुसलमान कसा असावा यांचे मूर्तिमंत रूप असलेले हे दोघे सख्खे भाऊ अतिशय देखणे, सुसंस्कृत नि दरियादिल असेच होते. मी संघ-स्वयंसेवक म्हणून ओळखला जात असूनही आमचे मैत्र छानपैकी अबाधित राहिले होते, नि त्याचे मूळ कारण त्यापैकी नौशादने चक्क प. पू. गोळवलकर गुरूजींचे व्याख्यान प्रत्यक्ष ऐकले होते आणि त्यात त्यांनी विशद केलेल्या राष्ट्रभक्तीवर तो चांगलाच प्रभावित झाला होता. अनेकांना हे सत्य कधीच कळले नसले तरी नौशादने ते स्वत: मला सांगितले होते. अकरावी पासून आम्ही एकाच कॉलेजात शिकलो - पी एम् बी गुजराती कॉलेजात नि नंतर एम् जी एम् मेडिकल कॉलेजात देखील. एन सी सीत तो सीनियर अंडर-ऑफ़िसर होता आमचा.
इंदोरच्या शक्कर बझार भागांत त्यांचे वडील गोरगरीबांचे डॉक्टर म्हणून प्रसिध्द होते. त्यांचा दवाखाना नेहमीच पेशंट्सनी ओसंडून वाहात असे. त्या जमान्यात इंदूरला डॉ. मुखर्जी हे सर्वोत्तम फिजिशियन असले तरी त्यांचे समकालीन डॉ. अकबर अली एफ सी पी एस् ही इंग्लंडातून मिळवलेली उपाधी असलेले आणि अतिशय तिरसट, कंजूष नि वाह्यात प्रवृत्तीचे होते. ते अगदीच निराळे असल्याने नौशाद-इरशादशी त्यांचा काहीच संबंध नव्हता !
ते असो, कारण मला आज माझ्या मित्रांबद्दलच कौतुकाने सांगायचे आहे.
मेडिकलला असताना आम्हा सर्वांचे जेवणाचे डबे घरून आणत असे डब्बेवाला. माझ्या आईच्या हातची भाजी नि कढी नौशादला खूप आवडायची नि त्याच्या घरून आलेला क्रीमभात मला ! कढी तर तो चक्क डब्याला तोंड लाऊन घटाघटा प्यायचा !
दोन हजार सालीं आमच्या चाळीसाव्या ‘री-यूनियन’ दरम्यान त्याची पुन्हा भेट झाली होती इंदुरांत. त्याने बालरोगतज्ञ म्हणून छान नावलौकिक मिळवला होता नि त्याची दोन्ही मुलें भारतीय सैन्यांत कार्यरत होतीं. इरशाद अमेरिकेत स्थायिक झाला आणि तिथे त्याने एम जी एमचा लौकिक नक्कीच वाढवला असणार.
पंधरा मे या नौशादच्या वाढदिवशी आम्हाला फोनवर बरीच वर्षें संपर्कात राहता आले.
आज अचानक जुन्या स्नेह्यांची नि वर्गमित्रांची याद आली आणि या अली ब्रदर्स विषयी तुम्हाला सांगावेसे वाटले !
रहाळकर
१६ सितंबर २०२४.