Thursday, July 31, 2025
ज्ञानेश्वरी इन्दौरी मराठीतून !
ज्ञानेश्वरी इन्दौरी मराठीतून !
आज एकतीस जुलाय, इंग्रजींत भाषांतर केलेल्या खटाटोपीचा चौदावा वर्धापन दिवस. सकाळपासूनच जरा बेचैन होतो की आता नवीन काही करायला सुचेल, किंवा जमेल काय. मग अचानक एक भन्नाट कल्पना शिवून गेली आणि वाटलं की मायमराठीपेक्षां तीच ज्ञानेश्वरी इन्दौरी लहेज्यांत संक्षिप्त किंवा सारांश रूपात मांडून पाहावी का ! कादंबरी स्वरूपात की व्याख्यान स्वरूपात ? पता नहीं. मात्र याच अनुषंगाने आठवला आम्हाला क्रमिक म्हणून नेमलेला विलियम बॉईड लिखित पॅथॉलॉजी किंवा विकृतिविज्ञानाचा भला मोठा ग्रंथ ! पॅथॉलॉजीसारख्या किचकट नि किळसवाण्या विषयाला बॉईडने इतक्या सुंदर पद्धतीने मांडले होते की ते एकमेव पुस्तक मी कादंबरी वाचावी एवढ्या तन्मयतेने किमान पंधरावीस वेळा वाचून काढले होते. आत्तां हातीं असलेल्या ज्ञानेश्वरीची देखील कित्येक पानें वेळोवेळी धुंडाळत आलोय मी एव्हाना. अर्थात विकृतिविज्ञानासारख्या किचकटपणाचा ज्ञानेश्वरीत मागमूसही नसून तींत ज्ञान-विज्ञानच नव्हे तर 'अंतिम सत्य' उलगडून सांगणारे महाज्ञान ठासून भरलेले लक्षात येईल.
मला माहीत आहे की इंग्रजीतल्या ज्ञानेश्वरीचे काठांवर उभे राहून अनेकांनी कौतुक केले असले तरी अम्मळ पाय सोडून त्या आंग्ल-गंगेंत फारसे कोणी उतरले नसणार ! आणि म्हणून आज वाटलं की तेच गंगास्नान तुम्हाला इन्दौरी मराठीत परौसतां येईल का ते पहावे. हा प्रयोग फसलाच तर कृपया क्षमा करावी या उच्छृंकल म्हाताऱ्याला ! मात्र त्यांतील भाव ओळखून ‘अवधान एकलें दीजे, मग सर्व सुखासी प्राप्त होईजे, हें प्रतिज्ञोत्तर माझे, उघड ऐका’ !
‘ज्ञानेश्वरी सारांश’————!
जवळपास आठशे वर्षांपूर्वी संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांनी कलियुगात होरपळून निघत असलेल्या पब्लिकसाठी एका बहारदार ग्रंथाची पायाभरणी केली, जी श्रोतृसंवाद म्हणून मानली जाते. वास्तवमधे संस्कृत भाषेत सांगितलेल्या भगवद्गीतेवरची ती कमेंटरी आहे असे म्हटले तरी त्याहूनही पलीकडचे गूढ-गहन ज्ञान महाराजांनी त्या वेळच्या सोहप्या प्राकृत मऱ्हाटीतून सांगितले. होय, सांगितले, कारण नेवाश्याच्या मंदिरात खांबाला टेकून महाराज जसे बोलत गेले तसे ते पटापट सच्चिदानंद बाबांनी लिहून ठेवले. त्या ग्रंथाची खूपशा पब्लिकने पारायणे केली म्हणतात आणि कालांतराने पाठभेदामुळे त्यांत काही त्रुटी घुसून गेल्या. त्यांचे शुद्धिकरण करायला संतश्रेष्ठ एकनाथ महाराज पुढे सरसावले आणि बाराशे बहात्तर साली लिहिला गेलेला हा ग्रंथ शुध्द स्वरूपात पंधराशे सहा सालीं पैठण येथून प्रसिद्ध झाला. तोच वाचत असतो बरं का आपण सर्व अधूनमधून.
काय बोलले हो ज्ञानेश्वर माहाराज इतके गूढ अन् गहन असे ! मुळीच नाही. त्या गहन गूढ ज्ञानाला त्यांनी जनरल पब्लिक, मग ते महाजन, मागासलेले, शूद्र, स्त्रिया - होय स्त्रियांना देखील वेद आणि उपनिषद ऐकण्या-वाचण्याला मज्जाव होता त्या काळी - या सर्वांना उच्च वर्ण पब्लिकबरोबरच मोकळे करून दिले होते.
त्या अठरा अध्यायवाल्या संस्कृत गीतेला महाराजांनी नऊ हजार मऱ्हाटी ओंव्यातून झकासपैकी रंगवून रंगवून सांगितले. इतके बहारदार की त्यांत सगळ्या नऊ, नव्हे अकरा, रसांचा भरपूर वापर तुम्हाला सहज जाणवेल.
अतिशय मनोहारी असा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ खरोखर भरपूर तन्मयतेने, उत्कटतेने, काळजीपूर्वक वाचण्यासाठी, परिशीलनासाठी आहे. हा ग्रंथ कितीही पवित्र, पूजनीय असला तरी त्याची जागा देवघरात किंवा फडताळांत जपून ठेवण्याची नसून तो नित्य वाचनात राहावा म्हणून आपल्या अभ्यासाच्या टेबलावर, दिवाणखान्यातील सेन्ट्रल स्टूलवर, इतकेच नव्हे तर हापिसातल्या टेबलवर देखील सहज हातात घेता येईल अशा ठिकाणी असावा. कारण आपले जीवन यथार्थपणे कसे जगावे याचा त्यांतील कानमंत्र हवा तेव्हा हाताशी असेल !
खरंतर आजच्या तरूणाईला जी मानवी मूल्यें जपण्याची नितांत गरज आहे, तिला हा ग्रंथ निश्चितपणे उपयुक्त ठरावा.
मला ठाऊक आहे की या प्रस्तावाला चक्क केराची टोपली दाखवली जाऊ शकते. पण किमान या ग्रंथाच्या संक्षिप्त, सारांश, ॲब्रिज्ड स्वरूपाला जवळ बाळगायला काय हरकत आहे ? माझी खात्री आहे की ते संक्षिप्त स्वरूप काहींना मूळ टेक्स्ट वाचायला भाग पाडील. ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य असे की यांत आध्यात्मिक गूढपण, तत्वज्ञान आणि काव्यात्मक प्रतिभेचा मनोहारी मिलाफ झालेला आढळून येईल !
हल्लीच्या ‘शिक्षित’ पीढीला ईश्वर विषयक संकल्पना, संत सत्पुरांचे आचरण, सनातन धर्माविषयीं अनास्था किंवा विपरीत ज्ञान आणि मूळ मानवी मूल्यांची जोपासना या सर्वांबद्दल प्रबोधन करणे गरजेचे होत चालले आहे. दासबोध-ज्ञानेश्वरीसारखे सद-ग्रंथ आजही खूप फायदा करू शकतात असा भरंवसा आहे.
आज के लिये इतनाही बस् !
रहाळकर
३१ जुलाय २०२५.